कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील राज्य परिवहन आगारात प्रशासनाने मोठा बदल करत विद्यमान आगारप्रमुख एस. डी. खताळ यांची अक्कलकोट येथे बदली केली असून त्यांच्या जागी विजयकुमार घोलप यांची नव्या आगारप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दि. 20 मार्च रोजी घोलप यांनी खताळ यांच्याकडून अधिकृतपणे पदभार स्वीकारत कळंब आगाराची सूत्रे हाती घेतली.

मात्र नव्या आगारप्रमुखांच्या स्वागतासोबतच कळंब आगारातील प्रश्नांचा डोंगर त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. आगारातील अनेक बस नादुरुस्त अवस्थेत असून प्रवाशांना याचा थेट फटका बसत आहे. त्यातच यांत्रिक विभागातील कामकाजाची पद्धत, बस स्थानकातील घाण पाणी, अस्वच्छता आणि दुर्लक्षित सुविधा यामुळे आगाराची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे नवीन नेतृत्व या साचलेल्या प्रश्नांवर कितपत आक्रमकपणे काम करते, याकडे कर्मचारी आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे. 

कळंब बसस्थानकातील स्वच्छतेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना, प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबतही नाराजी वाढत आहे. नादुरुस्त बस, उशिरा धावणाऱ्या फेऱ्या आणि असुविधेमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे विजयकुमार घोलप यांच्यासाठी हे पद केवळ पदभार नसून कार्यक्षमतेची खरी परीक्षा मानली जात आहे.

नियुक्तीनंतर विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने विजयकुमार घोलप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, वाहतूक निरीक्षक निलेश जाधव, वाहतूक नियंत्रक सुशील हुंबे, प्रशांत नानजकर, नामदेव जगताप, चेतन गोसावी, शिवाजी बांगर, विलास जाधव, प्रभाकर झांबरे , महेश थोरबोले, सायास खराटे, अनिल बांगर, गणेश काळे, एजास शेख, गणेश गोरे, आर. के. जोशी, बळीराम कवडे, राहुल तोरगले आदी उपस्थित होते.

तसेच कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने दोन्ही आगारप्रमुखांचा स्वागत व निरोप समारंभ घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष रवीकांत शिंदे, सचिव नितीन गायकवाड, कोषाध्यक्ष प्रशांत गायकवाड, प्रकाश पटेकर, लक्ष्मण जानराव, महेंद्र शेंडगे, विलास थोरात, डी. के. बीटे, अशोक रणदिवे, पांडुरंग गरड, सुनील जगताप तसेच महिला कर्मचारी पालके मॅडम, प्रियंका शिंदे, अनुराधा भोसले, पवार डी. एस., प्रशांत वेदपाठक आणि एम. बी. राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. 


“उत्पन्नवाढीसाठी सर्वांनी एकत्र या“

नवीन आगारप्रमुख विजयकुमार घोलप यांनी कर्मचाऱ्यांना स्पष्ट संदेश देताना सांगितले की, “सर्व वाहक-चालकांनी स्वतःची काळजी घेत कर्तव्य पार पाडावे. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू. प्रवासी आणि प्रशासनाला सहकार्य करत कळंब आगाराचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.“


 
Top