धाराशिव (प्रतिनिधी)- अमराठवाड्यासह राज्यभरातील ग्रामीण भागाचा सामाजिक परिपोष समृद्ध व्हावा यासाठी साहित्य ,संस्कृती, शिक्षण, समाज आणि पर्यावरण यासारख्या विविध क्षेत्रात कसलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन अखंड कार्य करत असलेल्या एकता फाउंडेशनच्या वतीने साहित्य संमेलनाच्या माध्यमातून दरवर्षी उत्कृष्ट साहित्य कृतींना राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. त्या अनुषंगाने सन 2025 चे साहित्य पुरस्कार यंदा शिरूर का. तालुक्यातील पाडळी येथील 8 एकता मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणार असल्याचे एकता कोर कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या राज्यस्तरीय पुरस्कारातील उत्कृष्ट संशोधन संपादन साहित्याचा पुरस्कार धाराशिवच्या डॉ. सौ.रेखा ढगे यांनी संपादित केलेल्या सावित्रीच्या कविता या साहित्यकृतीला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार कै. परमेश्वर भागुजी कैतके (लाईनमन) यांच्या स्मरणार्थ दिला जातो. सावित्रीच्या कविता या कविता संग्रहाचे संपादन डॉ.रेखा ढगे यांनी केले आहे तर, सहसंपादक म्हणून कविता रमेश पुदाले यांनी काम पाहिले यात धाराशिव सोबतच सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, कर्नाटक ,पुणे, तुळजापूर , नळदुर्ग या ठिकाणच्या कवयित्रींच्या कवितांचा समावेश आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील विविधपूर्ण 50 कवितांचा हा संग्रह अपूर्वाई प्रकाशनच्या डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी प्रकाशित केला. पाठराखण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी आणि लेखक श्रीकांत देशमुख नांदेड यांनी केली आहे अशा या जाणिवांना समृद्ध करणाऱ्या सावित्रीच्या कविता या संग्रहाची एकता फाउंडेशनने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करून यथोचित सन्मान केला आहे.
