धाराशिव (प्रतिनिधी)- स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा करताना आपण त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाला स्मरण करतो. पण त्याच संभाजी महाराज यांच्या स्मारकाच काम संथ गतीने होत असल्याचं आमदार कैलास पाटील यांनी सांगत हा प्रश्न अधिवेशनात मांडला.
यावेळी आमदार पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज“ होते म्हणून आम्ही आहोत. असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी देताना राज्य सरकारचा हात आखडता का घेतला जात आहे असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी वडू तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या स्मारकाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण होणार होते. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 282 कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 250 कोटी रुपये असा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात निधी देताना सरकारकडून अपेक्षित निधी दिला जात नाही. सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात केवळ 30 कोटी रुपये, तर 2025-26 मध्ये 46 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. 2025-26 च्या अर्थसंकल्पात 75 कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली होती. 2026-27 च्या अर्थसंकल्पात तर फक्त 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संभाजी महाराजांच्या स्मारकासारख्या ऐतिहासिक आणि अस्मितेच्या विषयावर अशी तुटपुंजी तरतूद करणे हे दुर्दैवी आहे असे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 250 कोटी रुपयांचा प्रस्ताव असून त्याला नियोजन विभागाच्या शिखर समितीची अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ही मान्यता तातडीने देऊन कामाला गती देणे आवश्यक आहे. अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ज्या पद्धतीने वर्षानुवर्षे रखडले आहे, तशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचे वडू तुळापूर येथील स्मारकही रखडू नये, यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली.
