कळंब (प्रतिनिधी)- सध्याच्या धावपळीच्या युगात बस चालकाने बस मध्ये आपला परिवार आहे असे समजून नशा पाणी न करता वाहन व्यवस्थित चालवावे व शिस्तीचे पालन करावे असे मत कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी कळंब येथे कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. येथील बस आगारात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे दि. 1 ते 31 जानेवारी या मासिका च्या कालावधीत राज्यभर आयोजन केले जात आहे.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन गुरुवार दि ,1 जानेवारी रोजी दुपारी 11 वाजता कळंब आगारात धाराशिव विभागाचे यंत्र अभियंता सूर्यकांत थोरबोले व कळंब पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कळबं आगाराचे प्रभारी आगार प्रमुख बालाजी भारती हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मोहन जाधव,कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक, स्थानक प्रमुख जानराव हे होते.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रभाकर झांबरे , वाहतूक नियंत्रक नामदेव जगताप , सुशिल हुंबे , प्रशांत नानजकर,सहाय्यक वाहतूक निरीक्षक निलेश जाधव , सुरेंद्र पायाळ, शिंदे मॅडम, श्रीमती शेख मॅडम चालक वाहक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते. यावेळी सडक सुरक्षा जीवन सुरक्षा सुरक्षितता मोहीम याविषयी मान्यवरांनी वाहक-चालक व प्रवाशांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गणेश गोरे यांनी केले . कार्यक्रमासाठी वाहक चालक व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
