धाराशिव (प्रतिनिधी)- महायुतीचे सरकार येऊन वर्ष झाले पण भाजपच्या नेत्यांनी प्रगती पेक्षा स्थगितीसाठी शक्ती पणाला लावल्याने जिल्ह्यात स्थगिती दिसली पण प्रगती काय दिसेना? असा थेट पलटवार शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी भाजपवर केला आहे.
यावेळी जाधवर म्हणाले की, दरवर्षी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आता पूर्ण असे सांगितले जाते. वस्तूस्थितीपासून भाजप कसा पळ काढतंय ते आज पुन्हा एकदा दिसून आले. तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्रासाठी एक हजार 865 कोटी मंजूर झाले पण एक रुपया पण अजून आलेला नाही. जी काम आज होत आहेत, संस्थानाच्या ठेवीतून केली जात आहेत. आजवर कधीही या रक्कमेला कोणीच हात लावला नव्हता ते काम भाजपने केले असल्याचे तानाजी जाधवर यांनी सांगितले. धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालय महाविकास आघाडीने मंजूर केले. मागील चार - पाच वर्षात यांचेच सरकार असूनही एक वीट सुद्धा या सत्ताधारी मंडळींना रचता आलेली नाही. दरवेळी प्रमाणे पुन्हा एकदा टेक्निकल टेक्सटाईलचा मुद्दा आलाच पण तिथेही मागील तीन ते चार वर्षाच्या काळात काहीच रचनात्मक काम झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. यांची कागदावरील कामाची यादी म्हणजे लांबत जाणारी हनुमानरायाच्या शेपटाप्रमाणे आहे. त्यामुळे यावर न बोलले बरं असा चिमटा जाधवर यांनी काढला आहे. ज्याप्रमाणे स्थगितीसाठी भाजपच्या नेत्यांनी शक्ती वापरली तशीच जिल्ह्याच्या विकासासाठी वापरली असती तर नक्कीच त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला असता. पण इथे महायुतीचे घटक पक्ष एकमेकांची जिरवण्यात धन्यता मानत असतील तर यांच्याकडून विकासाची अपेक्षा तरी कशी करणार असा प्रश्न तानाजी जाधवर यांनी उपस्थित केला आहे.