धाराशिव  (प्रतिनिधी) - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून दि.२ ऑक्टोबर रोजी तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचा सजवलेला रथ, ढोल बाजाच्या तालावर लेझीमच्या ठेक्यात आणि युद्ध नको बुद्ध हवा यासह विविध घोषणा देत अतिशय उत्साही वातावरणात धम्म रॅली काढण्यात आली. त्या रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला.

धाराशिव शहरात ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिशा समितीचे सदस्य सिध्दार्थ बनसोडे, माया कंपनीचे संस्थापक बाळासाहेब बनसोडे यांच्यावतीने धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. धाराशिव शहरातील क्रांती चौकातून या रॅलीचा प्रारंभ जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, मध्यवर्ती शिवजयंतीचे संस्थापक प्रकाश जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, भाजपचे नेते ऍड. व्यंकट गुंड, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विद्यानंद दादा बनसोडे, राजाभाऊ शेरखाने,  सय्यद खलील,  आशिष मोदणी, प्रशांत पाटील, शिवसेना (ठाकरे)  सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, काँग्रेसचे अग्निवेश शिंदे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन करण्यात आला. ही रॅली  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत बँड बाजाच्या तालावर लहान मुली, मुले व पुरुष यांनी लेझीमच्या तालावर व विविध बुद्ध व भीम गीतांच्या ठेक्यावर ताल, लय व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. हातामध्ये पंचशील, निळा ध्वज घेऊन युद्ध नको बुद्ध हवा, तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचा जयघोष करण्यात आला. यामुळे संपूर्ण परिसरातील वातावरण धम्ममय झाले होते.  या रॅलीची सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि माता रमाई यांच्या स्मृती स्तंभास पुष्पहार अर्पण करुन अभिवादनाने करण्यात आली. रॅलीच्या यशस्वितेसाठी विश्वजीत बनसोडे, लल्या बनसोडे, सागर बनसोडे, आकाश जानराव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.  . रॅलीच्या यशस्वितेसाठी विश्वजीत बनसोडे, लल्या बनसोडे, सागर बनसोडे, आकाश जानराव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 
Top