धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयात आलेल्या अवेळी पावसाने व अतिवृष्टीने शेतीचे नुकसान होते.या नुकसानीचे पंचनामे वेळेत करा. कोणत्याही शेतकऱ्यांची  याबाबत तक्रार येणार नाही,याची दक्षता घ्यावी.तसेच या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नाही यासाठी  खते व बियाणे वेळेत उपलब्ध करुन दयावे.असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज खरीप हंगाम -2025 आणि नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीस श्री.सरनाईक बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधिक्षक रितू खोकर,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धरमकर,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

सरनाईक बोलतांना पुढे म्हणाले, जिल्हयात पुर परिस्थिती निर्माण झाली तर पुर बांधितांच्या मदतीसाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध करुन घ्यावे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जिल्हयात आवश्यक त्या ठिकाणी वीज अटकाव यंत्र बसवावेत.तसेच ज्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्राची गरज आहे.त्या ठिकाणी यंत्रे लावण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.बाधित शेतकरी व नागरीक यांना व्यवस्थित मदत करण्यासाठी वस्तुनिष्ठ नुकसानीचे पंचनामे करावे.त्यामुळे बाधितांना शासनाकडुन योग्य मदत करता येणार असल्याचे श्री.सरनाईक यांनी सांगितले.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत खते व बियाणे मिळाले पाहिजे.असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की, खतांची साठवणूक करणाऱ्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी. बियाण्यांच्या पॅकेटमधून कमी बियाण्यांचा पुरवठा करु नये.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. याची दक्षता घ्यावी.पर्यावरणावर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत.त्यामुळे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन मोहिमेत सर्वांना सहभागी करुन घ्यावे. जिल्हयात वनक्षेत्र अत्यंत कमी आहे. त्यामुळे जिल्हयात वनक्षेत्र वाढीसाठी नियोजनातून वृक्ष लागवड करण्यात यावी.वनक्षेत्र वाढीसाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा.असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनातून जिल्हयात वनीकरण वाढवावे.वृक्ष लागवडीत मोहिमेत बांबू लागवड करण्यात यावी.वृक्ष लागवडीत यापूर्वी जिल्हयात ज्यांनी चांगले काम केले आहे.त्यांना सन्मानीत करण्यात यावे.असेही श्री.सरनाईक यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले, जिल्हयातील 159 गावे नदीकाठावर आहे.त्यापैकी 15 गावे अंशता पुर प्रवण आहे.जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालयात पूर बचाव साहित्य उपलब्ध आहे.तालुका पातळीवर पुरपरिस्थितीतून बचावासाठी सराव प्रात्याक्षिके घेण्यात आली.पावसाळा कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे.आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण अधिकारी-कर्मचाऱ्यांचे घेण्यात आले आहे.असे त्यांनी सांगितले.

श्रीमती जाधव यांनी सांगितले की,माहे मे -2025 मध्ये 298 टक्के झाला असून त्याची सरासरी 25.9 मी.मी.इतकी आहे.जून 2025 मध्ये 10 जूनपर्यंत 54 टक्के पाऊस झाला असुन त्याची सरासरी 46.7 मि.मी. इतकी आहे.जिल्हयात मे-2025 मध्ये 34 मंडळात अतिवृष्टी झाली. एप्रिल-2025 मध्ये अवेळी पाऊस, वादळीवारा व गारपीटीमुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले 434 शेतकऱ्यांचे जिरायत,बागायत व फळपिकांचे एकूण-294 .42 हेक्टरवर नुकसान झाले.शासन निकषानुसार 1 कोटी 3 लक्ष रुपये निधी मिळणे अपेक्षित आहे.मे 2025 मध्ये 10 हजार 846 शेतकऱ्यांचे 4694 हेक्टर बांधित झाले. मदतीसाठी 8 कोटी 37 लक्ष रुपये मिळणे अपेक्षीत आहे.असे श्रीमती जाधव यांनी सांगितले.

सन 2025 मध्ये आलेल्या अवेळी पावसामुळे 110 गावे बाधित झाल्याचे सांगून श्रीमती जाधव म्हणाल्या की,3 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले.8 लहान तर 53 मोठे दुधाळ जनावरे मुख्यता वीज पडल्याने मृत्यूमुखी पडली.ओढकाम करणारी 11 जनावरे अशी एकूण 72 जनावरे मृत्युमुखी पडली.या पावसामुळे 147 घरांची अंशता पडझड झाली.5 झोपडया तर 22 गुरांचे गोठे बाधित झाल्याची माहिती श्रीमती जाधव यांनी दिली.

खरीप हंगाम -2025 साठी 11 जूनपर्यंत 1045.95 मे.टन युरीया आणि 260 मे.टन डी.ए.पी.उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.माने यांनी दिली. डिएपीला पर्यायी खतांचा वापर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. भरारी पथकाने कारवाई करुन या हंगामात 10 परवाने निलंबित केले.9परवाने कायमस्वरुपी रद्द केले.3 परवानाधारकांना ताकीद दिली.2 परवानाधारकाविरुध्द एफआयआर नोंदविण्यात आला. वाशी तालुक्यात विना परवाना अनधिकृत खतसाठा केल्यामुळे 4 लक्ष 61 हजार रुपये किमतीचे 20.21 क्विटल खत जप्त करुन एफ आय आर दाखल केल्याचे श्री.माने यांनी सांगितले.

धरमकर यावेळी म्हणाले की या पावसाळ्यात जिल्ह्यात 50 लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, त्यापैकी 15 लक्ष वृक्षारोपण येत्या 19 जुलै रोजी करणार आहे.अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या आढावा बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास,एसटीचे विभाग नियंत्रक विनोद भालेराव,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डोके, सार्वजनकि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण, विभागीय वन अधिकारी बी.ए.पोळ, सामाजिक वनीकरणाचे विभागीय वनअधिकारी व्ही.के.करे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


 
Top