धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव व तुळजापूर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकावर एसटी प्रवाशांसाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नसताना त्याचे उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आले. ज्या अधिकाऱ्यांनी हे कार्यक्रम ठरवले. त्या संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

पालकमंत्री सरनाईक गुरूवार दि. 12 जून रोजी धाराशिव मध्ये आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम व नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सरनाईक यांनी प्रवाशांना कोणती सुविधा उपलब्ध करून दिली नाही. त्याबद्दल खेद व्यक्त करून बसस्थानकाचे कामे पूर्ण झाले नसतानाही उद्घाटनाचा घोळ घातला. हे अत्यंत दुखदायक घटना आहे. 


खाजगीकरण होणार नाही

एसटी महामंडळाचे खाजगीकरण कधी ही होणार नाही. महामंडळास सध्या 10 हजार अधिकारी व 1 लाख कर्मचारी काम करतात. महामंडळ नफ्यात आणण्यासाठी ठेकेदार बस करार रद्द केला आहे. महामंडळा स्वतः बसेस विकत घेणार आहे. महामंडळाच्या अनेक जागा प्राईम लोकेशनला असून, गुजरात येथे राबवलेल्या योजनेप्रमाणे काही भुखंड डेव्हलपरला देवून बाकी जागेचे डेव्हलमेंट करण्यात येईल व यातून मिळालेल्या उत्पन्नातून बसेसची खरेदी होईल. गेल्या 8 ते 10 वर्ष महामंडळाने बसेस घेतल्या नाहीत असेही पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले. 


17 जूनला मुंबई बैठक

तुळजापूर येथे भवानी मातेचे 108 फुटी छत्रपती शिवाजी महाराज यांना तलवार देणारे जे शिल्प उभारले जाणार आहे त्या संदर्भात 17 जूनला मुंबई येथे बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत भवानी मातेचे मुर्ती द्विभुजा असणार की, अष्टभूजा असणार यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत अशी मुर्ती साकारली जाईल असे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले. 


माझ्या वडीलांचे नाव मला माहित आहे

पत्रकारांनी नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात विचारले असता पालकमंत्री सरनाईक यांनी माझ्या वडीलांचे नाव मला माहिती आहे. माझ्या नावापुढे मी आईचे व वडीलांचे नाव लावतो असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे तो विषय संपला.


मी नाराज झालो

पालकमंत्री म्हणून मी जिल्हा नियोजन बैठकीत जे काय निर्णय विकास कामाबाबत घेतले होते त्या कामाला स्थगिती दिली गेली. इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असताना आपल्या जिल्ह्यात कामाला स्थगिती आहे. त्यामुळे मी अत्यंत नाराज झालो. या संदर्भात लवकरच कामावरील स्थगिती उठविली जाईल असे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले. 


बाळासाहेबांची परपंरा

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे नेते राज ठाकरे यांची भेट झाली. या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांचे दिलदारपणाने पाहुचार करण्याचे धोरण राज ठाकरे राबवत आहेत. त्यामुळे कधी कुणाशी राजकीय सूर जळतील हे सांगता येते नाही असे सरनाईक म्हणाले. 


वादग्रस्त निविदा रद्द

धाराशिव शहरातील रस्त्याबाबत काढण्यात आलेली 140 कोटी रूपयांची निविदा अखेर रद्द करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री सरनाईक यांनी पत्रकारांना सांगितला. शहरातील रस्त्याबाबत फेर निविदा काढण्यात येईल. रस्त्याचे काम उत्तम दर्जाचे होण्यासाठी आयआयटी मुंबई येथील पथक ॲडीट करतील असे सरनाईक यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार, सीईओ मैनाक घोष, पोलिस अधीक्षक रितू खोकर यासह अधिकारी उपस्थित होते.


 
Top