कळंब (प्रतिनिधी)- आग्रोवन आणि शिखर बँकेच्या सहकार्याने व्हियेतनाम शेतकरी अभ्यास दौर दि 1 जून ते 7 जून 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी  संपूर्ण महाराष्ट्रातून 35 व्यक्तींची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये प्रयोगशील शेतकरी, उद्योजक, संशोधक, शेती सल्लागार, निर्यातदार, कृषी क्षेत्रातील अधिकारी इ चा समावेश होता. 

या दौ-यात प्रत्यक्ष फार्मला भेट देऊन तेथील मॅनेजर/शेतक-याकडून माहिती जाणून घेतली. यावेळी वारंवार भाषेची अडचण येत होती. परंतु दुभाषीकाच्या मदतीने ती सोडवण्याचा प्रयत्न केला जात होता. आपल्या सारखी तेथील जमीनीची मालकी शेतकऱ्यांकडे नसुन ती शासनाकडे आहे. संपूर्ण जमीन व्हियेतनाम सरकारच्या मालकीची आहे. शेतक-याला जमीन त्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येवर गुंठे/ हेक्टर मध्ये करार करून मोफत कसायला दिली जाते. नंतर तो शेतकरी कितीही वर्षे ती जमीन कसू शकतो , कर्जासाठी बँकेस तारण म्हणून ठेऊ शकतो मात्र तो त्या जमिनीचा मालक  कदापि होऊ शकत नाही आणि ती जमीन दुसऱ्या व्यक्ती ला विकूही शकत नाही. आपल्या प्रमाणे तेथील शेतक-यांना सवलती च्या दराने बी-बियाणे, खते पुरविली जातात व शेतीविषयक मार्गदर्शन कृषी खात्याकडून दिले जाते. मात्र आपल्या प्रमाणे कृषी पिक विमा अथवा अन्य घटकांकडून नुकसान भरपाई मिळत नाही ना पीक कर्ज माफ केले जात नाही. शेतमाल/ फळे/ भाजीपाला शेतकरी स्वखर्चाने आणून स्थानीक बाजारात विकतो. सरकार हमी भावाने खरेदी करीत नाही. एवढ्या समस्या असुन देखील तेथे एकाही शेतकऱ्यांने  आत्महत्या केल्याची घटना घडलेली नाही हे विषेश. 

शासन शेतमाल प्रक्रिया आणि निर्यातीसाठी प्रोत्साहन देते. विविध प्लांट उभारणीसाठी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन करून निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देते. परवाना पद्धत सोपी असून एका वर्षात माल निर्यातीचा परवाना मिळतो. आम्ही भेटी दिलेल्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न नव्हता पाणी मुबलक होते. हवामान उष्ण व दमट होते. छोट्या पावर ट्रिलरच्या साह्याने नऊ इंच उंचीचे व चार-चार फुट रूंद बेड बनवले जातात, दोन्ही बाजूला सरी सोडली जाते. बियाणे लावल्यानंतर बेडवर  डोम तयार करून आच्छादन लावले जाते. संपूर्ण फार्मवर दहा फूट उंचीचे सिमेंट पोल चा आधार देऊन ,नेट लाऊन पिकांचे उन्हा पासून संरक्षण केलेले दिसुन आले. बेड वर लावलेल्या पिकाची मशागत सरीमध्ये बसून केली जाते. वेलवर्गीय पिके मांडवावर घेतली जातात. पिकाला पाणी एक ईंच रबरी पाईप ने दीले जाते. पाणी 15 ते 20 फुटावर लागते. जागोजागी हातपंप बसवले होते. हाताने/मोटरने पाणी दिले जात होते. पाण्याची प्रत उत्तम व पिण्यायोग्य होती. पाण्याचा टीडीएस व जमिनीची प्रत आम्ही प्रत्यक्ष यंत्राद्वारे तपासुन पाहून खातरजमा केली. पाणी पिऊन देखील पाहीले.

एकंदरीत लघु व अल्प भूधारक  शेतक-यांचे प्रमाण 65 ते 70% असुन ते देशाच्या जडण घडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते. तेथे भातशेती प्रमुख असुन जगात ती प्रथम क्रमांकावर आहे. त्याबरोबर रबर, मसाले, मत्स्य व्यवसाय, कुक्कुट व वराहपालन ,भाजीपाला, फळांचे काप, ज्यूस व पल्प यामध्ये देखील त्यांचा दबदबा दिसून येतो. मशागती साठी बैला ऐवजी म्हशी-रेडकांचा वापर केला जातो. म्हशी ला ते पवित्र व पूजनीय मानतात. शेती कृषी यंत्राद्वारे केली जाते. ईतर जनावरे खुपच कमी प्रमाणात आढळून आली. तेथील महिला पुरुषापेक्षा आधिक कष्टाळू असुन कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळताना दिसून येते. या वेळी भारतीय उच्चायुक्तालयाला भेट देऊन तेथील आधिका-याबरोबर शेती,आरोग्य, शेतमाल आयात-निर्यात परवाना, शेती संरक्षण ई विषयावर वार्तालाप करण्याची संधी मिळाली. त्यातील एक अधिकारी महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर येथे सेवा दिलेले आढळून आले. 

व्हियेतनामीयांच्या चिवटपणा मुळेच ते बलाढ्य अमेरिकेबरोबर तब्बल वीस वर्षे झुंजत राहू शकले आणि शेवटी अमेरिकेला आपल्या देशातून पळवुन लाऊन ऐतिहासिक युद्ध जिंकू शकले. तसेच येथील जागतिक वारसा लाभलेले हो लाँग बे बीच, लोकल मार्केट, स्ट्रीट फूड्स,प्रशिद्द ऑगस्ट चौक, चर्च, टेंपल ऑफ लिटरेचर, बुद्ध टेंपल, ट्रेन स्ट्रीट ई स्थळांना भेटी दिल्या. 

अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी शिखर बँकेचे प्रशासक श्री विद्याधर आनास्कर साहेब, आग्रोवन चे संपादक संचालक श्री आदिनाथ चव्हाण साहेब, टूर नियोजक तथा शेतमाल निर्यातदार श्रीमती धनश्री शुक्ल मॅडम, टुर समन्वयक श्री गणेश मोरे, सर्व टीम सदस्य, स्थानिक टूर गाईड मास्टर पीटर आणि आपले आशिर्वाद यांची मोलाची मदत झाली.

 
Top