मुरुम (प्रतिनीधी)- वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा होत असून यामागे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार, वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीची निष्ठा, श्रद्धा, आणि धैर्यामुळे यमराज प्रभावित झाले आणि सत्यवानाला जीवनदान दिले. वडाच्या झाडाला त्रिदेवांचे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. एवढेच नसून, त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे. वटपौर्णिमा हा सण केवळ श्रद्धेचा विषय नसून त्यामागे आरोग्य, पर्यावरण, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र यांचे सुसंगत विज्ञान दडलेले आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ संजय अस्वले याप्रसंगी केले.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय ग्रीन क्लब अंतर्गत वटपौर्णिमेचे औचित्य साधून वटवृक्षाचे रोपण आणि पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अस्वले यांच्या हस्ते करण्यात आले
वड (वटवृक्ष) हा २४ तास ऑक्सिजन सोडतो (रात्रीही), जे इतर झाडांमध्ये विरळच असते. म्हणून त्याच्या झाडाखाली बसणे हे प्राणवायू मिळवण्याच्या दृष्टीने लाभदायक असते. वडाच्या सालीपासून, दूध (latex), पाने, पारंब्या आणि मुळांपासून अनेक आयुर्वेदीक औषधे तयार केली जातात. स्त्रियांचा वडाच्या झाडाभोवती सूत गुंडाळून प्रदक्षिणा घालताना जमिनीशी थेट संपर्क होत असल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मन:शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. महिलांचा एकत्र येऊन पूजा, कथा सांगणं, संवाद साधणं हे सुद्धा समूह मनोविज्ञान सुधारण्यास मदत करतं. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून महाविद्यालयीन परिसरात वटवृक्षरोपण करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ पद्माकर पिटले, डॉ विनोद देवरकर, डॉ अशोक पदमपल्ले, डॉ धनंजय मेनकुदळे, श्री सतीश जगताप, नाईक श्री अनिल तुंगे आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.