कळंब: (प्रतिनिधी)- आपल्या मुलांना उद्याच्या भविष्यासाठी तयार करायचे असेल, तर त्यांना यश आणि अपयश दोन्ही स्वीकारायला शिकवा. जीवनातील स्पर्धा कधीही न संपणाऱ्या असतात, त्यामुळे या स्पर्धेत माणूस म्हणून टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असे विचार माजी सनदी अधिकारी आणि प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले. ते कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार समारंभात बोलत होते. हा कार्यक्रम कळंब येथे बुधवारी (दि. ११ जून) पार पडला.
देशमुख पुढे म्हणाले की, केवळ पैसा, प्रतिष्ठा आणि संपत्तीच्या लोभातून करिअर निवडू नका. तुम्हाला कशात आनंद मिळतो हे शोधा. नीतिमत्ता जपून पैसा कमवण्यात काहीच गैर नाही. ज्या क्षेत्रात तुमची आवड आहे, त्यात तुम्ही उच्च शिखर गाठा. वाईट जगात रमण्याऐवजी चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करा. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना चांगले माणूस बनवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. इंद्रजित देशमुख यांनी आपल्या प्रेरणादायी व्याख्यानात जीवनातील सुख आणि समाधानाचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आणि ज्ञानार्जनातून जीवनात यशस्वी होण्याचे मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी अशोक पाटील, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे, सहाय्यक निबंधक बालाजी सावतर, पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे,राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले, विस्तार अधिकारी भारत देवगुडे जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, वाशी तालुका संघाचे अध्यक्ष संतोष मोळवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे चेअरमन बाळकृष्ण तांबारे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, पतसंस्थेचे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून, त्यामुळे संस्थेची राज्यभर चांगली प्रतिमा आहे. सभासदांच्या हितासाठी संस्था नेहमीच कार्यरत असते. वर्षभरात सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी अकरा हजार रुपयांची मदत आणि गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार संस्थेतर्फे केला जातो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेच्या वतीने इयत्ता ५ वी नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी, बारावी, मेडिकल व इंजिनिअरिंग परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवलेल्या सुमारे ८० विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, फेटा, बुके, प्रेरणादायी पुस्तके आणि इंग्रजी शब्दकोश देऊन गौरव करण्यात आला. तसेच, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून धनादेश प्रदान करण्यात आले. यासोबतच, सेवानिवृत्त शिक्षकांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यात आल्याने वातावरण भावुक झाले होते.
शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व विशद केले आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले आणि संस्थेच्या या प्रशंसनीय उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष भागवत जाधवर संचालक दत्तात्रय पवार, भक्तराज दिवाने,अशोक डिकले, सुनील बोरकर, भूषण नानजकर, गणेश कोठावळे,दीपक चालक,दत्तात्रय सुरेवाड, रामचंद्र पवार, रवींद्र शिनगारे, श्रीम वैशाली क्षीरसागर,श्रीम ज्योती ढेपे श्रीम कालिंदा मुंढे, सचिव संतोष ठोंबरे, संघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत घुटे यांनी परिश्रम घेतले
या सत्कार सोहळ्याला संचालक मंडळ, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हणमंत पडवळ आणि श्रीमती ढेपे यांनी केले, तर आभार भक्तराज दिवाने यांनी मानले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.