भूम  (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील बहुचर्चित भूम आगाराच्या भूम -बोरिवली या बसचे पुण्याकडे जाताना मागील एक टायर  गळून पडल्याने व एक टायर अडकून पडल्याने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस मध्ये प्रवास करत असलेल्या 85 प्रवाशांचा जीव वाचला आहे. योगायोगाने आज परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धाराशिव जिल्ह्यामध्ये असताना ही घटना घडली आहे 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भूम आगारातून सकाळी आठ वाजता सुटणारी भूम -बोरीवली ही बस (क्र एम एच 20 बी एल 2102) नेहमीप्रमाणे भूम ते-बोरीवली जात असताना पुणे सोलापूर हायवे वरील  भिगवण जवळील खडकी गावादरम्यान दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एसटी बसचे मागचे एक टायर निघून व एक टायर प्रेशर आल्याने मध्येच अडकून पडल्याने मोठा अपघात होता होता टळला. यावेळी सदर बस मध्ये 85 प्रवासी प्रवास करत होते. आज सकाळपासूनच भूम आगारांमध्ये नियमित धावणाऱ्या गाड्या अचानकपणे गळती व खिडक्या अ नसल्याच्या कारणाने आगारांमध्ये होत्या. व काही एस. टी बस रद्द करण्यातआल्या असल्याचे सांगण्यात आले. धाराशिव येथील यंत्र अभियंता सूर्यकांत थोरबोले धाराशिव येथील 10 यांत्रिक कामगारांची टीम घेऊन भूम आगारांमध्ये येऊन भूम आगारातल्या ज्या गाड्या आज पेंडिंग ठेवण्यात आलेल्या आहेत. याबाबत त्यांची यांत्रिक टीम एसटी बसेस दुरुस्त करण्याचे काम करत आहे .दररोज भूम आगारातून धावणाऱ्या या बसेस आज अचानकपणे कशा नादुरुस्त झाल्या. त्या दुरुस्त करण्यासाठी भूम आगारातील यांत्रिक कामगाराद्वारे दुरुस्त होणारे एसटी बसेस धाराशिव येथील यांत्रिक कामगाराद्वारे दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने धाराशिवचे यंत्र अभियंता सूर्यकांत थोरबोले यांच्याशी चर्चा केली असता लवकरच भूम आगाराचा विस्कटलेला कारभार सुरळीत होईल. प्रवाशांची सेवा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी प्रभारी आगारप्रमुख श्रीकांत सुरवसे, ए डब्ल्यू एस कवडे उपस्थित होते. राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धाराशिव जिल्ह्यात असताना भूम आगाराच्यावतीने गाडी नादुरुस्त होऊन एक आगळी वेगळी भेट दिल्याची चर्चा प्रवासी वर्गातून ऐकण्यास मिळत आहे.


आज गुरुवार भूमचा आठवडी बाजार असताना सुट्टीचा हंगाम समाप्तीकडे असताना आगारातून धावणाऱ्या बसेस अचानकपणे आजारी पडल्याने नियमितपणे जाणारी भूम -लातूर, भूम नगर पुणे, भूम बार्शी, स्वारगेट-पुणे यासह दररोज सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आज सकाळी बोरिवली वरून येणारी भूम आगाराची एम एच 20 बी एल 2637 ही बस प्रवासात बंद पडल्याने सदर बस पनवेल आगारात जमा केली. या झालेल्या महामंडळाच्या नुकसानाला कोण जबाबदार आहे. यासाठी भूम आगाराला कायमस्वरूपी एसटी बसेस वर उपचार करणारा आगर प्रमुख देण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

 
Top