धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून चांगले काम करण्याचा उद्देश ठेवून मी आले असून, यासाठी पत्रकारांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मित्र आणि मार्गदर्शक बनावे. असे आवाहन नवनियुक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी केले.
पोलीस अधीक्षक म्हणून पदभार हाती घेतलेल्या रितू खोखर यांचा सत्कार पत्रकार बांधवांनी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खोखर यांनी मनमोकळ्या गप्पा मारत जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पत्रकारांच्या सहकार्याची गरज असून, पोलिसांची जिथे चूक होईल तिथे निश्चितपणे पत्रकारांनी चुका दाखवून देण्याचे देखील आवाहन केले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो, त्यामुळे पोलीस प्रशासन म्हणून काम करताना या चौथ्या स्तंभाची वेळोवेळी गरज पडणार आहे. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलिसांकडून काही त्रुटी होऊ शकतात, परंतु, या त्रुटी मित्र आणि मार्गदर्शक म्हणून पत्रकारांनी दाखवून दिल्यास त्याचा आम्हाला फायदा होईल असेही खोखर यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात अंमली पदार्थांचे बेकायदेशीरपणे सेवन आणि विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुळजापूर येथे वाहतुकीचा नवीन विभाग काढण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वृक्षतोड नाही
पोलीस अधीक्षक निवासस्थानाच्या परिसरातील वृक्षतोड केल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन करून परिसरातील एकही वृक्ष तोडला नसून, त्यांची फक्त छाटणी केल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील काही वृक्ष मोठ्या प्रमाणावर वाढले असून, फांद्या घरावर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच डासांचा उपद्रव देखील वाढल्यामुळे झाडांची छाटणी करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे झाडांची फक्त छाटणी केली असून, एकही वृक्ष तोडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचीही उपस्थिती होती. यावेळी पत्रकार राजाभाऊ वैद्य, अमजद सय्यद, विनोद बाकले, सज्जन यादव आणि किरण कांबळे यांची उपस्थिती होती.