धाराशिव (प्रतिनिधी)- भारतात स्वतंत्रपूर्व काळात शाहू महाराजांनी लोकशाहीचा पाया घातला असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुरेश वाघमारे यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने धाराशिव येथील माता रमाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,धाराशिव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत असताना प्रा. डॉ. सुरेश वाघमारे म्हणाले की, शाहु महाराजांची दुरदृष्टी, सर्व समाजाप्रती आसणारी व्यापक दृष्टी खूप महत्त्वाची होती. कोल्हापूर संस्थानांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण, उद्योग, शेती व्यवसाय, सामाजिक, आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रात, सुधारणावादी, परिवर्तनवादी, धोरणे अवलंबून त्यांनी कोल्हापूर संस्थानांमध्ये एका अर्थाने लोकशाहीचा पाया घातला.
अध्यक्षीय समारोप करताना नानासाहेब पाटील यांनी देव,धर्म अनिष्ट रूढी, परंपरा भाषा, जाती, कशा निर्माण झाल्या त्याची चिकित्सक मांडणी केली. मानवी जीवनात संस्कारास किती महत्त्वाचे स्थान आहे हे त्यांनी पटवून दिले. यापुढे आपणास शाहू महाराजांच्या विचारानेच वाटचाल करावी लागणार आहे असे ते म्हणाले. यावेळी प्रा.सोमनाथ लांडगे यांना राजमाता अहिल्याबाई होळकर राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल व श्री. प्रविण बागल यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछञपती पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल ,बुके ,सन्मानपञ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. एस. गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. के. मस्के यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मिलिंद जानराव यांनी केला. कार्यक्रमाचे आभार नागनाथ गोरसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रवी सुरवसे, मारुती पवार, राजेंद्र अंगरखे, दीपक कांबळे, अमोल गडबडे, ॲड. अजित कांबळे, विकास काकडे, हनुमंत गायकवाड, ञिशाला ठाणांबीर यांनी परिश्रम घेतले.