भूम (प्रतिनिधी)- सावळ्या विठ्ठलाचे रूप डोळे भरून पाहण्यासाठी संत मुक्ताईच्या पालखीचे भूम शहरात हजारो वारकऱ्यासह शहरात आगमन झाले. आगमन होताच शहरवासीयांनी जोरदार आतषबाजी करत पालखी व वारकऱ्यांचे स्वागत करून दर्शन घेतले. सकाळी येथील वाशी रोडमार्गे गोलाई चौक, मेन रोडमार्गे येथील चीडेश्वरी मंदिर येथे संत मुक्ताईंचा पालखी सोहळा विसावला. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सकाळचा नाष्टा नागोबा तरुण गणेश मंडळाच्यावतीने, तर कोष्टी समाजबांधवांच्या वतीने भोजन वारकऱ्यांना देण्यात आले.
हा पालखी सोहळा रवींद्र हायस्कूल येथे मुक्कामी राहून रविवारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. शहरात संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व माजी उपनगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांनी पालखीचे पूजन करून लवकर पाऊस पडू दे, अशी प्रार्थना केली. यावेळी सूरज गाढवे, साहील गाढवे, रामभाऊ बागडे, सुनील माळी,दत्ता नलवडे यांच्यासह संजय गाढवे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. पालखी सोहळा नगरपालिका चौकात दाखल होताच पालिकेच्यावतीने पालखीचे अभियंता गणेश जगदाळे ,ज्ञानेश्वर टकले व कर्मचाऱ्यांनी स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री संत बाळूमामा यांची पालखी भूम शहरातच असल्यामुळे बाळूमामाच्या पालखी सोबतच्या मेंढराणी येथील नगरपालिका चौकात संत मुक्ताबाई यांच्या पालखीला मेंढरांचे गोल रिंगण केले. यावेळी भाविक उपस्थित होते. हे रिंगण भूम शहरातील भक्तांना प्रथमच पाहण्यास मिळाल्याने शहराला यात्रेचे स्वरूप आले.