नळदुर्ग(प्रतिनिधी)-  मे महिन्यातील व जून च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सलगरा दिवटी व होर्टी साठवण तलाव पूर्ण पणे भरून वाहत असल्याने नळदुर्गच्या बोरी धरणात येणारा पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे बोरी धरण येत्या आठ दिवसात पूर्णपणे भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान बोरी धरणाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे की, धरण पूर्ण क्षमतेने जून महिन्यात भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मे महिन्यात व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सलगरा दिवटी व होर्टी चे दोन्ही साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून वसंतून वाहत असल्यामुळे बोरी धरणाच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या एक महिन्यापासून सतत नळदुर्ग परिसरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पूर्व मशागतीसाठी शेती अजूनही तयार झालेली नाही. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या पावसामुळे पडीक पडल्या असून मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला असतानाच आता सततच्या पावसामुळे नळदुर्ग व परिसरातील ग्रामीण भागातील बरेच साठवण तलाव मोठ्या प्रमाणे भरत आले आहेत. तर होर्टी आणि सलगरा दिवटी या दोन्ही गावच्या साठवण तलावातून गुरुवार दिनांक 12 जून रोजी रात्री झालेल्या मोठ्या पावसामुळे साठवण तलाव पूर्णपणे ओसंडून वाहत आहेत. बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे बोरी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढत आहे. दरम्यान पाणीसाठा वाढण्याची गती जी गती आहे, ती पाहता येणाऱ्या आठ दिवसात बोरे धरण पूर्णपणे भरून वाहण्याचे शक्यता निर्माण झाली आहे. 


प्रथमच जूनमध्ये भरणार बोरी धरण 

हे बोरी धरण 1971 मध्ये बांधून तयार झाले आहे. 1971 ते 2025 या कालावधी मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बोरी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वेगाने वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी हेच धरण जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात पूर्णपणे भरून वाहिले होते. तर यावर्षी जून महिन्याच्या वीस तारखेपर्यंत हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस आणि येणारे पाणी पाहता आठ दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरणार अशी चर्चा शेतकऱ्यातून व नागरिकांतून होत आहे. मात्र धरण भरण्याचे शक्यता निर्माण झाली असली तरी शेतकऱ्यांची खरीप पेरणी कधी होणार याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण सततच्या पावसामुळे जमिनी इतक्या भिजल्या आहेत की, जमिनीचा वापसा होण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस पावसाने उघडीप देणे गरजेचे आहे. 


प्रथमच जूनमध्ये मादी धबधबा वाहून लागला

त्याचबरोबर येथील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील नर मादी धबधब्यापैकी मादी हा धबधबा सुरू होऊन जवळपास एक महिना होत आला आहे. आता नर आणि मादी हे दोन्ही धबधबे वाहण्यासाठी आता काही अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पर्यटकांना यावर्षी चार ते पाच महिने जिल्ह्यातील धबधब्याचे दृश्य पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.


 
Top