धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील काजळा येथील रामानंद महाराज विद्यामंदिरात 30 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांसाठी शाळेची घंटा पुन्हा वाजली. तब्बल तीस वषार्र्ंनी 1995 च्या बॅचच्या विद्यार्थ्यानी एकमेकांना भेटल्यानंतर सर्वांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते. माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी शाळा आणि शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
काजळा येथील रामानंद महाराज विद्यामंदिरात 1995-96 साली दहावी झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात उत्साहात पार पडला. या बॅचचे विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांनी एकत्र येण्यासाठी व्हाटसअप ग्रुप तयार केला. सर्वांच्या सोयीनुसार स्नेहमेळावा घेण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली. सर्वांना भेटता येणार याचा आनंद सर्वांनाच होता. एकुण 70 विद्यार्थी, विद्यार्थिनी स्नेहमेळाव्यासाठी एकत्र आले.
शाळेत आल्यानंतर माजी विद्यार्थ्यांसाठी 30 वर्षानंतर शाळेची घंटा पुन्हा वाजली. त्यानंतर सर्वांनी प्रार्थना व राष्ट्रगीत गायले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांना छडी मारत गुरुजींनी वर्गात प्रवेश दिला. या बॅचला शिकविणारे मुख्याध्यापक शिवाजी वागदकर, जि.प. शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अली मेहताब शेख, अरुण सातपुते, भीमाशंकर शिवपुरे, भीमाशंकर मळेवाडी व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्नेह मेळाव्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला प्रोजेक्टर भेट देण्यात आला. रामानंद महाराज मंदिराच्या सभागृहात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. जुन्या आठवणींना उजाळा देताना सर्वांचे डोळे पाणावले होते. त्यानंतर रामानंद महाराज यांची प्रतिमा देऊन सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.