धाराशिव  (प्रतिनिधी) - संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदा लागू आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील तो लागू आहे मात्र जिल्ह्यामध्ये गुटखा व तत्सम वस्तूंची विक्री राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे अनेकजण व्यसनाधीन होत आहेत. ते रोखण्यासाठी सकारात्मक पावले उचलून गुटखा व तत्सम वस्तूंच्या विक्रीस तात्काळ प्रतिबंध करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अन्न व औषधे प्रशासन अधिकारी, अन्न, औषधे व भेसळ विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान प्रशासनाने कारवाई करण्यास हलगर्जीपणा केल्यास आंदोलनासह राष्ट्रवादी स्टाईलने बंदोबस्त करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण भागातील गल्लीबोळामध्ये गुटखा व तत्सम वस्तूंची विक्री राजरोसपणे चालू आहे. त्यामुळे हजारो तरुणांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. परंतू आपल्या विभागामार्फत यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या गुटखा व तत्सम वस्तुंची विक्री ही संबंधित विभाग, एजन्सी व विक्रेते तसेच अधिकाऱ्यांच्या संगणमताने चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाचा धाक राहिलेला नसल्यामुळे त्याला आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गुटखा व तत्सम वस्तूंची विक्री रोखण्यास व प्रतिबंधात्मक कारवाई न केल्यास आमरण उपोषणासह राष्ट्रवादी स्टाईलने कार्यक्रम लावण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावर कळंब धाराशिव विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, अमर हुंबे व ज्ञानेश्वर खैरे यांच्या सह्या आहेत.

 
Top