!
कळंब (प्रतिनिधी)- शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, याची तक्रार नगर परिषदेकडे सातत्याने येत असताना संबंधितांना समस्या सोडवण्यात अपयश आले आहे. मात्र, या जनावरांचा वेळेत बंदोबस्त न झाल्यास रस्त्यांवरील पादचारी व वाहन चालकांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार कायम असणार आहे.
रस्त्यांवर मोकाट जनावरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या जनावरांना अटकाव करण्यात यावा. अशी मागणी कित्येक दिवसांपासून होत आहे. तसे बंदोबस्त व्हावा म्हणून नियमावली ठरवत कारवाईचे परिपत्रक नगरपरिषदेकडून काढण्यात आले. मात्र, याला न जुमानता गुरांचे मालक बिनधास्तपणे जनावरांना मोकाट सोडून देत आहेत.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, होळकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानक परिसर, ढोकी नाक्यावर दिवसरात्र मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या वेळी शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर मोकाट गुरे ठाण मांडून असतात. त्यामुळे त्यांना धडकून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. अनेक वेळा वाहतुकीचाही खोळंबा होतो. शहरात गेली अनेक वर्षे मोकाट गुरांचा उपद्रव होत असताना श्वानांची ही संख्या वाढत असूनही त्यावर ठोस उपाययोजना होत नाही.
आता शहरात शाळा, महाविद्यालय सुरू झाल्याने रहदारी नेहमी पेक्षा जास्त वाढली आहे. त्यात मोकाट जनावरांचा उच्छाद वाढल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण भर रस्त्यात वारंवार जनावरांच्या धावाधाव होत असल्याने नागरिकांची धावपळ उडते. यामध्ये बेसावध पादचाऱ्यांना दुखापत झाल्याची अनेक घटना येथे घडल्या आहेत. शहरातून जाणाऱ्या मार्गावर मोकाट जनावरांचे वास्तव असल्याने नेहमीच रहदारीला अडथळा होत असल्याने पादचाऱ्यांना उपद्रव सहन करावा लागतो. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कामे झाले की देतात सोडून
शहर व लगतच्या गावातील काही व्यवसायिक रोजगार मिळवण्या पुरताच वापर करतात. त्यानंतर या गुरे, ढोर पोसणे त्यांना परवडत नसल्याने ती मोकाट सोडून दिली जातात. ही जनावरे दिवस - रात्र शहरात भटकत असतात.