तुळजापूर (प्रतिनिधी)- कृषि संशोधन व शिक्षण विभाग/ भारतीय कृषि अनुसंधान परिषद व कृषी व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विध्यमाने दि. 29 मे ते 12 जुन 2025 या दरम्यान संपूर्ण भारतातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये “विकसित कृषी संकल्प अभियान” हे राष्ट्रीय अभियान राबविण्यात येत आहे. त्याकरिता, महाराष्ट्रातील प्रत्येक कृषि विज्ञान केंद्रामधून 2 पथके  दि. 29 मे ते 12 जुन 2025 या दरम्यान हे अभियान राबविणार आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर मार्फत हे अभियान धाराशिव जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे आणि त्याकरिता कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी विभाग व आत्मा चे अधिकारी व कर्मचारी, भारतीय कृषि अनुसंधान परिषद व कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी आदिंचा समावेश असणारी 2 पथकेही तयार करण्यात आली आहेत. सदरील पथके 15 दिवस धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये दिनांक 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान जवळपास 90 गावात जावून हे खरीप हंगामपूर्व अभियान राबविणार आहेत. या अभियानात सदरील गावांमध्ये वरील कालावधी दरम्यान शास्त्रज्ञ भेटी देऊन खरीप पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, आपत्कालीन पिक योजना, कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञान, केंद्र व राज्य शासनाच्या शेती संबंधित विविध योजना, हवामानाचा अंदाज, कीड व रोग नियंत्रण, पशुसंवर्धन, काढणी पश्चात तंत्रज्ञान आदि विषयांवर शेतकऱ्यांसमवेत विचार मंथन करणार आहेत. 

कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर तर्फे या अभियानाकरिता दोन पथके तयार करण्यात आलेली असून सदरील पथकात कृषी विद्या, कीड व रोग, मृदा व पाणी, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, उद्यानविद्या इत्यादी विषयांच्या तज्ञांचा समावेश करण्यात आलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा निपटारा गावातच करणे शक्य होईल. सोबतच शेतकऱ्यांना बीजउगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, कीड व रोग फवारणी करताना घ्यावयाची काळजी आदिची प्रात्यक्षिके देखील दिली जाणार आहेत. ही दोन पथके कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील धाराशिव, कळंब, वाशी, भूम, परंडा, तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुक्यातील एकूण 90 गावात जाऊन शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्व तयारीवर मार्गदर्शन करणार आहेत.  तरी शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर कार्यालयाचे प्रमुख डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी केले आहे.

 
Top