धाराशिव (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे 'संकल्प ते सिद्धी' अभियान राबवले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून रविवारी, 15 जून रोजी धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘जनता दरबार'चे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमातून नागरिकांच्या अडचणी आणि समस्या थेट ऐकून त्यांचे शासकीय आणि पक्ष पातळीवर निराकरण करण्याचा भाजपचा मानस आहे. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या उपक्रमात नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला. धाराशिव, तुळजापूर आणि कळंब या तालुक्यांमध्ये एकूण सहा ठिकाणी हे दरबार आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान 228 लेखी तक्रारी आल्या होत्या तर याच वेळ आलेल्या अनेक तक्रारींचा निपटारा जागेवरच करण्यात आला. घरकुल हप्त्यांचे थकबाकी प्रकरण, नळजोडणी, ग्रामपंचायतीशी संबंधित तक्रारी, वीज, रस्ते अशा स्थानिक स्वरूपाच्या अनेक समस्यांवर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तात्काळ निर्णय घेण्यात आले. काही बाबी पुढील कार्यवाहीसाठी नोंदवून घेतल्या गेल्या. या उपक्रमासंदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले की, जनतेने आता अडचणींसाठी तालुक्याच्या किंवा जिल्हा कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही. भाजपा थेट गावात जाऊन प्रश्न समजून घेत आहे आणि तिथेच उपायही शोधत आहे. हाच आमचा 'जनतेशी थेट संवाद' ठेवण्याचा प्रयत्न आहे.