धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्रविभागातर्फे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ‘दृष्टीदिन पंधरवडा' चे उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हा पंधरवडा दिवंगत डॉ.रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 10 जून ते 24 जून 2025 या कालावधीत राबवण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ,नेत्रविभाग प्रमुख डॉ.अनुजा कंदले, नेत्रशल्यचिकित्सक डॉ.एम.के.पल्ला, डॉ.महेश पाटील,डॉ.ज्योती कानडे, डॉ.सुनंदा सूर्यवंशी,डॉ.सायली कोकाटे, अधिसेविका सुमित्रा गोरे, नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे,रामराजे बिडवे,श्रीकांत कल्याणी, निलेश कुरील,तसेच जिल्ह्यातील सर्व नेत्रचिकित्सा अधिकारी,वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागांचे वॉर्ड इन्चार्ज व अधिपरिचारिका यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात डॉ.महेश पाटील यांनी ‘दृष्टीदिन पंधरवडा' साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करत,नेत्रसुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले.डॉ.ज्योती कानडे यांनी डॉ.भालचंद्र यांच्या कार्याचा आदरपूर्वक उल्लेख करत सांगितले की,त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत,कोणतीही आधुनिक साधने नसताना,हजारो अंध रुग्णांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली.हे सामाजिक कार्य प्रेरणादायी असून नव्या पिढीनेही त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा,असे मत त्यांनी व्यक्त केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी डॉ.भालचंद्र यांच्या कार्याला उजाळा देत आजच्या काळात आधुनिक यंत्रणा आणि सोयीसुविधांमुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया अत्यंत सहज आणि सुरक्षित झाल्याचे सांगितले.त्यांनी उपस्थित सर्वांना मरणोत्तर नेत्रदानाबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आणि नेत्रदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ यांनी सन 2024-25 या वर्षात राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिवच्या नेत्रविभागाने मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये दुसरा क्रमांक मिळवल्याची माहिती दिली आणि विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.तसेच,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ सर्व जनतेने घ्यावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
‘दृष्टीदिन पंधरवडा'चे औचित्य साधून डॉ.एम.के.पल्ला,डॉ.महेश पाटील आणि डॉ.ज्योती कानडे यांनी एकूण 28 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रौफ शेख यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेत्रविभागातील सर्व अधिकारी,नर्सिंग स्टाफ व वर्ग-4 कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.दृष्टी ही अनमोल देणगी आहे,आणि अशा कार्यक्रमांमुळे समाजात नेत्रदान आणि नेत्रसुरक्षेबाबत जागरूकता वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.