लातूर (प्रतिनिधी)- महावितरणचे कार्यकारी संचालक (वितरण) दत्तात्रय पडळकर यांनी  (दि.27 जून) लातूर परिमंडळातील मुख्यमंत्री सौरकृषीवाहिनी 2.0 या महत्वाकांक्षी योजनेच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

विद्युतभवन येथे पार पडलेल्या या बैठकीत सौरकृषीवाहिनी 2.0 योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची सविस्तर माहिती घेतली गेली. श्री. पडळकर यांनी झालेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेत असताना, शेतकऱ्यांना वेळेत आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, बीड मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत, धाराशिव मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय आडे तसेच सर्व विभागाचे कार्यकारी अभियंता, तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते. श्री. पडळकर यांनी कामाच्या गुणवत्तेवर भर देत, उपकेंद्रामधील पॉवर ट्रान्सफॉर्मर, रोहीत्रांची क्षमतावाढ, बे व ब्रेकरची कामे कसलीही कारणे न सांगता वेळेत पुर्ण करण्याच्या सुचना करत, याकामी  कोणतीही अडचण आल्यास तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर वेळोवेळी सुचना देवूनही ज्या एजन्सी कामात दिरंगाई करत आहेत त्यांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री सौरकृषीवाहिनी 2.0 या योजनेमुळे लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा सातत्याने वीज मिळणार असून, शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास श्री. पडळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी वीजबील वसुलीचा आढावा घेत वीजबील वसुलीची कार्यक्षमता वाढवण्याकरिता काही मौलिक सुचना केल्या. प्रत्येक जनमित्रांनी दररोज किमान 10 ते 15 रिसीप्ट जमा केल्या तर वेळेच्या आत वीजबील वसुलीचे लक्ष्य साध्य होईल असे निर्देश दिले. बैठकीनंतर कार्यकारी संचालक-2 श्री पडळकर यांनी बर्दापूर व पळशी येथील सौरकृषीवाहिनी 2.0 च्या प्रकल्पांनर भेट देत झालेल्या कामांची पाहणी केली.


 
Top