भूम (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या लबाड महायुती सरकारचा जाहिर निषेध आणि सरकारच्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश करत दि. 11 जून रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भूम तहसील कार्यालयासमोर भव्य घंटानाद आणि धरणे आंदोलन छेडण्यात आले.

या आंदोलनात विविध प्रलंबित मागण्यांसाठी आवाज उठवण्यात आला. दुपारी 12.30 वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी “क्या हुवा तेरा वादा?” असे सवाल करीत शासनाच्या दिशाभूल करणाऱ्या धोरणांचा निषेध नोंदवला.

जर शासनाने मागण्या तात्काळ मंजूर करून अंमलात आणल्या नाहीत, तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला होता. शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी,  किसान सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी 15,000 मिळावेत, महिलांना दरमहा 2100 मानधन, . 45,000 पानंद रस्त्यांचे बांधकाम,अनुदान परत मिळावे, वृध्द नागरिकांना 2100 पेन्शन, शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा, 'हर घर जल, हर घर छत' योजनेतून घरकुल अनुदान, गोदावरी - कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला देऊन वॉटर ग्रीड योजना. भूम शहरात प्रीपेड मीटर धोरण तात्काळ रद्द, अमृत योजना -2.0 योजनेअंतर्गत नळ कनेक्शनवरील मीटर बसविण्याला विरोध या आंदोलना दरम्यान शिवसेना नेत्यांनी भूम तहसीलदारांच्या जयवंत पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले.

यावेळी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, अनिल शेंडगे, चेतन बोराडे, दिलीप शाळू महाराज, प्रकाश आकरे, महिला संघटक उमाताई रणदिवे, अब्दुल सय्यद, अविनाश गटकळ, अजय कोकाटे, रफीक तांबोळी, श्रीमंत भडके व अनेक शिवसैनिक उपस्थित होते. 


 
Top