धाराशिव(प्रतिनिधी) - धाराशिव शहरातील एका शाळकरी बहिणीची छेड काढणाऱ्यास जाब विचारणाऱ्या भावाचा आरोपींनी संगणमताने ठेचून निर्घृणपणे हत्या केली. ही अत्यंत गंभीर घटना असताना देखील पोलिसांनी तपासात अक्षम्य दिरंगाई केली असून सर्व आरोपींना अद्यापही अटक केलेली नाही. संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. यासह इतर विविध मागण्यांसाठी व या गंभीर बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर वडार एकता परिषदेच्यावतीने दि.13 जून रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा वडार एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष भरत विटकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दि.7 जून रोजी दिला आहे.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आलेले आहे की, धाराशिव शहरात दि.8 मे रोजी वडार समाजातील विद्यार्थिनी रस्त्याने जात असताना धाराशिव शहरातील टवाळखोर गुंडांनी तिची छेडछाड काढली. त्यामुळे तिचा भाऊ मारुती शिवाजी इटलकर याने संबंधितांना जाब विचारला. त्याचा राग मनात धरून रणजीत चौधरी याच्या सांगण्यावरून सागर चौधरी, प्रवीण चौधरी, किशोर चौधरी, अंकुश चौधरी व सिद्धनाथ सावंत यांनी संगणमत करून मारुती इटलकर यास अमानुष बेदम मारहाण केली. त्यांनी केलेल्या मारहाणीत मारुती जबर जखमी झाला. त्यास उपचारासाठी दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्या परिवाराला मदत करावी. आदी मागण्यासाठी खून झालेल्या इटळकर यांच्या घरापासून हा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. या निवेदनावर वडार एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष भरत विटकर, प्रदेशाध्यक्ष शिवाजी ननावरे, प्रदेश संपर्कप्रमुख माणिक विटकर, जिल्हा समन्वयक बालाजी शिंगे, मी महाराष्ट्राचा वडार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, विकास पवार, राहुल जाधव, अंकुश दुर्लेकर, नितीन चौगुले, धनंजय जाधव, दत्ता जाधव, दीपक दुर्लेकर, अंकुश चौगुले, अभिषेक देवकर, महादेव इटलकर, नामदेव घोडके, सुरज जाधव, अनिल चौगुले आदींच्या सह्या आहेत.