धाराशिव (प्रतिनिधी)- मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. मागील पंधरा दिवसांपासून सलग सुरू असलेल्या या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे शेती, फळबागा, जनावरे, घरे आणि इतर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वीज पडून दोन जण दगावले असून आजवर 36 जनावरे दगावली आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर व धाराशिव तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तातडीने पंचनामे पूर्ण करून मदतीसाठी स्वयंस्पष्ट अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात विजा कोसळून पशुधनही दगावले आहे. अनेक ठिकाणी कांदा, पपई, द्राक्ष, कोथिंबीर आणि टरबूज यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मसला (खुर्द), लासोना (धाराशिव) परिसरातील बाळूदेव कुलकर्णी, लक्ष्मीकांत कदम, नरसिंग कुंभार, विलास नाईकनवरे, सुभाष नाईकनवरे, उमेश साळुंके आदी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.
याप्रसंगी दत्ता कुलकर्णी, सतीश दंडनाईक, संतोष बोबडे, महादेव जाधव, आनंद कंदले, दयानंद शिंदे, दिनेश बागल, सुदर्शन जाधव, उद्धव पाटील, गुरुलिंग स्वामी, नागनाथ पवार, संजय स्वामी, ज्ञानेश्वर जंगाले, निळकंठ पाटील यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले पंचनामे करून घ्यावेत
धाराशिव जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने मोठं नुकसान झाल्याने प्रशासनाला दिलेल्या निर्देशानुसार युद्ध पातळीवर पंचनामे सुरू असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले पंचनामे करून घावेत. कांही अडचण असेल तर तहसीलदारांना फक्त एसएमएस करा. त्यांच्याकडून प्रतिसाद नाही मिळाला तर मला सांगा असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.