धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) सुरू केला असून, स्थानिक युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेच्या प्रकल्प मर्यादेत मोठी वाढ करण्यात आली असून याच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु व सेवा उद्योगांना चालना दिली जात आहे.जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
योजनेमध्ये उत्पादन उद्योगासाठी प्रकल्प मर्यादा ₹ ५० लाखांवरून ₹ १कोटीपर्यंत वाढविण्यात आली आहे, तर सेवा व कृषीपूरक उद्योगांसाठी ₹२० लाखांवरून ₹ ५० लाखांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अनुदानाचे प्रमाण पूर्वीप्रमाणेच राहणार असून, अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.या योजनेच्या लाभासाठी १८ वर्षे पूर्ण असलेले कोणतेही व्यक्ती अर्ज करू शकतात,यापूर्वी असलेली वयोमर्यादा देखील हटविण्यात आली असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
पात्र उद्योगांमध्ये कुक्कुटपालन (अंडी उबवणीसह),
व रेशीम उद्योगांचा समावेश करावा यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला होता त्यास यश मिळाले असून यासोबतच
मधमाशीपालन, ई-वाहतूक, बोट व्यवसाय, मत्स्यपालन, जलक्रीडा, मासेमारी, हॉटेल्स (शाकाहारी व मांसाहारी), होमस्टे, क्लाऊड किचन इत्यादी नवीन प्रकल्पाचा अंतर्भाव झाला आहे.
अधिक माहितीसाठी प्रा.किरण आवटे, प्रतिष्ठान भवन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
तीन वर्षात जिल्ह्यात १०००० उद्योजक
मुख्यमंत्री बदेवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २०२२ मध्ये आपण या योजनेच्या माध्यमातून वर्षाला १००० उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.त्याला मोठे यश मिळाले असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेत गेल्या तीन वर्षात आतापर्यंत तरुण,महिला मिळून २४०० उद्योजक तयार झाले असून या योजनेसोबत प्रधानमंत्री मंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP),विविध महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १०००० होतकरू स्वयंरोजगाराची कास धरत स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.