धाराशिव (प्रतिनिधी)- यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात 50 लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. 19 जुलै रोजी एकाच दिवशी 20 लक्ष वृक्ष करण्याचे नियोजन केले असून, वृक्ष लागवडीशी संबंधित सर्व नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी यांनी आपआपल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन मोहिमेच्या तयारीचा आढावा घेताना पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर,शिरीष यादव, उदयसिंह भोसले,संतोष राऊत, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक करे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, मृदा व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर महामुनी,जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रकांत राऊळ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले, सूर्यकांत भुजबळ, देवदत्त गिरी,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मोमीन, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.
गाळमुक्त धरण गतीने पूर्ण करा
गाव पातळीवर प्रत्येक गावातून 300 व्यक्ती या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होतील. असे सांगून पुजार म्हणाले की,6 महिन्यानंतर वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा घेण्यात येणार आहे. वृक्ष लागवड करताना कोणत्या ठिकाणी कोणते वृक्ष लावावे हे निश्चित करावे. येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक होऊन भूजल पातळी वाढवण्यासाठी जलतारा प्रकल्प मोठ्या प्रमाणात हाती घ्यावेत. शेतकऱ्यांना शेतात जाणे सोयीचे व्हावे. तसेच शेतातील उत्पादित माल घरी किंवा बाजारपेठेत घेऊन जाणे सोयीचे व्हावे यासाठी अतिक्रमित रस्ते व पानंद रस्ते मोकळे करावे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची कामे वेगाने पूर्ण करावीत. असेही निर्देश पुजार यांनी दिले. या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी ऑनलाईन तर संबंधित यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.