धाराशिव (प्रतिनिधी)- पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले. याचा भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेत पाकिस्तानला त्यांची औकात दाखवली. भारतीय सैन्याच्या या शूर पराक्रमाचा धाराशिव शहरात गुरुवारी भव्यदिव्य तिरंगा रॅली काढून गौरव करण्यात आला. भारत मातेचा आणि भारतीय सैन्य दलाने केलेल्या कामगिरीचा जयघोष करीत या रॅलीने तमाम धाराशिवकरानी भारतवासीयामध्ये देशाभिमानाची ज्योत पेटवली.
शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या आदेशाने शिवसेनेतर्फे ही भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, जिल्हा संघटक सुधीर पाटील, जिल्हाप्रमुख मोहन पनूरे यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ चौक येथून करण्यात आली. श्रीपतराव भोसले हायस्कूल, आरपी कॉलेज, छत्रपती संभाजी महाराज चौक, संत गाडगेबाबा महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही रॅली विसर्जित करण्यात आली.
या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या भारतीय जवानांच्या वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. नागरिकांच्या हातात असलेले तिरंगा ध्वज, देशभक्तीपर गाणी, वारकरी गीत यामुळे अवघे शहर दणाणून गेले. या रॅलीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महिला, शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, वारकरी, माजी सैनिक, देशाभिमानी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.