उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शहरात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. येत्या आठ दिवसात वीजपुरवठा सुरळीत होणेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, शहरातील घनकचरा, गटारी स्वच्छता याकडे लक्ष द्यावे, पाणीपुरवठा योजनेसाठी फोडलेले सर्व रस्ते भरुन घ्यावेत, आठवडा बाजाराचे व्यवस्थापक करावे, आपल्या कर्तव्यात कसूर केल्यास गत केली जाणार नसल्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
उमरगा शहरातील वीज समस्या व नगरपालिका नागरी सुविधाबाबत उमरगा विश्रामगृहावर आमदार प्रवीण स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.23) बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेना युवा नेते डॉ. अजिंक्य पाटील, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, राष्ट्रवादी (शप.) चे तालुकाध्यक्ष संजय पवार, बाजार समितीचे माजी सभापती रणधीर पवार, महावितरण कार्यकारी अभियंता नंदकुमार काळे, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार स्वामी यांनी शहरातील वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्या असून वीज कर्मचारी सतत फोन बंद ठेवतात. त्यामुळे याबाबत वस्तुस्थिती नागरिकांना कळत नाही. कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीज खंडित झाल्यास ग्राहकांना किती वेळेत लाईट येईल व काय फॉल्ट झाला आहे याची माहिती मिळत नाही. ग्राहकांना वेगवेगळ्या माध्यमातून अशावेळी कळविल्यास लोकांचे समाधान होऊ शकते. वीजपुरवठा खंडित झाल्यास लोकांचा उद्रेक वाढल्यास त्यास संबंधित विज मंडळाचे कर्मचारी जबाबदार राहतील. पावसाळा सुरू होत असल्याने वीज खंडित होण्याच्या तक्रारी येता कामा नये याची खबरदारी घ्यावी.
मागील अनेक दिवसांपासून घनकचरा व्यवस्थापनाबाबत तक्रारी आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत कोणतीही नवीन रस्ते फोडू नयेत, फोडलेले रस्ते 9 जून पूर्वी दुरुस्त करून नळ कनेक्शनचे काम पूर्ण करावे, कोणताही नवीन रस्ता फोडत असल्याचे निदर्शनास नागरिकांनी हे काम थांबवावे. असे आवाहन आमदार प्रविण स्वामी यांनी केले