धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी सण,उत्सव,धार्मिक कार्यक्रम व विविध आंदोलने यांचा विचार करता,जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात 29 मे 2025 रोजी 00:01 वाजेपासून 11 जून 2025 रोजी 24:00 वाजेपर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
हा आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) नुसार लागू करण्यात आला आहे.महाराणा प्रताप जयंती (29 मे),राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती (31 मे),शिवराज्याभिषेक सोहळा (6 व 7 जून),तसेच बकरी ईद (9 जून) हे सण व उत्सव शांततेत पार पडावेत,यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत.शिवाय मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण,वक्फ कायदा विरोध,शेतकरी आंदोलने, पिकविमा व नुकसान भरपाई संदर्भातील मागण्या यावरून आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी या काळात जिल्ह्यात पुढील गोष्टींवर बंदी घातली आहे. कोणत्याही प्रकारचे शस्त्र,सोटे,तलवार, बंदूक,लाठ्या,दगड किंवा इजा करणाऱ्या वस्तू बाळगणे,स्फोटके,दाहक पदार्थ,किंवा फेकण्यायोग्य साधने जवळ ठेवणे,आवेशी भाषणे,विडंबनात्मक कृती,संविधानविरोधी घोषणा,चित्रफलक,असभ्य वर्तन किंवा सामाजिक सलोखा बिघडवणारी कृती करणे,पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव,मोर्चा,मिरवणूक काढणे यास प्रतिबंध राहील.
या आदेशाची अंमलबजावणी शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर लागू होणार नाही.तसेच धार्मिक,सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी संबंधितांनी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. जिल्ह्यात सण,यात्रा,जत्रा आणि उरूस या काळात शांततेत साजरे व्हावेत तसेच संभाव्यआंदोलनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,याकरिता प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून शांतता आणि सुव्यवस्था राखावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.