भूम (प्रतिनिधी)-  पाथरुड ता. भूम येथील प्राध्यापक अलका सपकाळ यांना मातंग साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने दिला जाणारा 2025 सालच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला. महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यसभेचे मा. सदस्य डॉ. विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्या शुभहस्ते मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक 13 एप्रिल रविवार रोजी भारतीय विचार साधनेचे सभागृह, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे मुख्य कार्यालयाच्या इमारतीत प्रदान केला जाणार आहे. सपकाळ यांनी आपल्या लेखणीतून कष्टकरी, शोषित वंचित महिला वर्गाच्या प्रश्नावर सातत्याने लेखन केले. त्यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. समाजामध्ये समता बंधुता मानवता या मूल्याची रुजवण करण्यासाठी “चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची  संयोजन समितीच्या अध्यक्ष म्हणून योगदान देत आहेत. सालं 2025 मधील हा सपकाळ यांचा दुसरा पुरस्कार आहे. त्यांचेवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.


 
Top