धाराशिव (प्रतिनिधी)- संस्कार भारतीचा बीड येथील कंकालेश्वर महोत्सव महाराष्ट्रामध्ये संपन्न होणाऱ्या अनेक महोत्सवापैकी एक महत्त्वाचा महोत्सव ठरला आहे गेल्या 29वर्षापासूनची ही परंपरा बीड संस्कार भारतीने नेत्र दीपक चालवली आहे असे उद्गार संस्कार भारती पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे यांनी काढले.
बीड येथे कनकालेश्वर महोत्सव 2025 निमित्ताने पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, पूर्व महामंत्री व अमृत महोत्सव सत्कारमूर्ती कुलदीप धुमाळे, युवा नेते योगेश क्षीरसागर, संस्कार भारती देवगिरी प्रांत अध्यक्षा प्रा. स्नेहलताई पाठक, पूर्व प्रांत अध्यक्ष भारत लोळगे, प्रांत सह महामंत्री डॉ. सतीश महामुनी, प्रांत साहित्य विभाग प्रमुख डॉ. विद्यासागर पाटांगणकर, प्रांत दृश्य कला संयोजक कलाध्यापक शेषनाथ वाघ, प्रांताचे मंत्री प्रमोद वझे, प्रांत प्रसिद्धी प्रमुख महेश वाघमारे, धाराशिव जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये बीड संस्कार भारतीची दिनदर्शिका व देवगिरी प्रांताची दैनंदिनी (डायरी) याचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी तेराव्या शतकातील प्राचीन असणाऱ्या कनकालेश्वर महादेव मंदिर तलावामध्ये पाण्यावर तरंगते व्यासपीठ करून सदर व्यासपीठावर शास्त्रीय नृत्य आणि लोकसंगीताचे बहारदार सादरीकरण संपन्न झाले. शेकडो बीड येथील नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
या निमित्ताने पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे यांनी आपण बीडचा कनकालेश्वर महोत्सव मागील 28 वर्षापासून वेगवेगळ्या राष्ट्रीय बैठकीमध्ये ऐकलेला होता यावर्षी मला या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आले आणि हा तरंगता रंगमंच मला पाहता आला याचे मनोमन आनंद असल्याचे सांगितले.
या निमित्ताने युवा नेते योगेश क्षीरसागर यांनी कंकालेश्वर महोत्सव आज राज्य पातळीवर चर्चेत आहे तो देशपातळीवर चर्चेत राहण्यासाठी आगामी वर्षापासून सर्व तो सहकार्य आपण या महोत्सवाला करू. बीडचे कलाक्षेत्रातील संस्कार भारती चे काम अत्यंत प्रभावी आहे ते समाजाला उपयुक्त आहे यामधून कलावंत निर्मिती होते असे सांगितले. कार्यक्रमाचा समारोप करताना प्रांत अध्यक्षा प्रा. स्नेहलताई पाठक यांनी विविध कलाक्षेत्रात संस्कार भारती प्रदीर्घ काळापासून काम करते आहे. विविध कलांचे विद्यार्थी आणि त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण हे संस्कार भारतीच्या कामाचे वैशिष्ट्य आहे.
कनकालेश्वर महोत्सव हा तर बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा महोत्सव व्हावा असे याचे देखणे स्वरूप आहे ते असेच वृद्धिंगत होईल असे गौरवोद्गार काढले.प्रास्ताविक प्रांत मंत्री प्रमोद वझे यांनी केले तर सूत्रसंचलन सुरेश साळुंखे यांनी केले.