धाराशिव (प्रतिनिधी)-पोलीस ठाणे नळदुर्ग हददीतील मौजे गंधोरा पाटी येथे काही अज्ञात चोरटयांनी रिन्यू कंपनीच्या पवनचक्कीचे रखवालदारांना बांधून ठेवून त्यांना मारहाण करून तेथील पवनचक्कीचे आतील वायरमधील तांब्याच्या तारा बळजबरीने चोरून नेली होती. सदरबाबत पोस्टे नळदुर्ग येथे अज्ञात आरोपीविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तपास करून टोळी गजाआड केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक कासार व त्यांचे पथकाने तंत्रज्ञानाचे सहाय्याने तसेच पारंपारीक स्त्रोताकडून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने काही महत्वपुर्ण पुरावे शोधून काढले. उपलब्ध माहितीला अनुसरून सुनिल कालीदास शिंदे वय 36 वर्ष रा.दत्तनगर पारधी पिढी ढोकी ता. जि. धाराशिव, सरदार उर्फ गणेश शंकर काळे रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव ह. मु. येळंब घाट ता. जि. बिड, राहुल लाला शिंदे वय 29 वर्ष रा. दत्तनगर पारधी पिढी ढोकी ता. जि. धाराशिव यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान तीनही आरोपींना नमुद गुन्हा त्यांनी स्वत: आणि इतर 08 आरोपीनी मिळून केल्याची कबुली दिली. तसेच धाराशिव जिल्हयात यापुर्वी दाखल अशाच स्वरूपाच्या इतर 06 गुन्हयाची देखील आरोपींनी कबुली दिली. त्यांतील एकूण 721 फुट लांबीची तांब्याची तार व गुन्हयात वापरलेले वाहन टाटा सुमो असा एकूण 12 लाख 23 हजार 450 रूपयाचा मुददेमाल काढून दिलेला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी व मुददेमाल पुढील कारवाईकामी पोलीस ठाणे नळदुर्ग यांचे ताब्यात देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी मागील काही दिवसांपासून पवनचक्कीवर लुटमार करणरी टोळी ताब्यात घेतल्यामुळे पवनचक्की कंपन्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे नेतृत्वात सपोनि सुदर्शन कासार यांनी स्वतः व त्यांचे पथकातील सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फहरान पठाण, दयानंद गादेकर, पोअं योगेश कोळी, चालक नितीन भोसले यांनी यशस्वीरित्या पुर्ण केली आहे.


 
Top