कळंब (प्रतिनिधी)-  येथील बस स्थानकात केवळ मोठ्या तीनच लाईट चालू आहेत. बाकी सर्व लाईट बंद अवस्थेत दिसतात. केज पॉईंट पूर्णतः अंधारातच आहे. यामुळे राप प्रशासनाने तात्काळ लाईट लावून सर्व बस स्थानक परिसरात उजेड करावा. त्याचबरोबर बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संख्या वाढवून होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालावा. अशी मागणी प्रवाशातून जोर धरत आहे. विशेष म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याच जिल्ह्यात अशी घटना घडत आहे.

कळंब बस स्थानकाचा परिसर जवळपास पाच ते सहा एकराचा आहे. विशेष म्हणजे परिसरातील येरमाळा सारखी मोठ्या यात्रा चालू आहे. एवढ्या मोठ्या परिसरात बस स्थानकासमोरच केवळ दोन मोठे व शेजारी एक छोटा असे तीनच बल्ब आहेत. त्यामुळे परिसरात संपूर्ण अंधार असतो. या अंधाराचा फायदा घेऊन अनेक वेळेस चोरांनी प्रवाशांना लुटीचे प्रकार घडले आहे. यामध्ये प्रवाशांना मारहाण करणे, बॅगा लूटणे, खिसे कापणे, मोबाईल पळवणे अशा अनेक घटना यापूर्वीही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संख्या अगदी बोटावर मोजण्या इतकीच आहे. त्यामुळे पोलिसांना चोराचा मागोवा लागत नाही. 

त्यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे राज्य परिवहन महामंडळाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. पहाटेच्या वेळी बस स्थानकावर पुणे, कोल्हापूर, मुंबई, बोरवली अशा अनेक रात्र राणी बसेस येतात. त्यामुळे प्रवाशांची चढउतार नेहमीच होते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राप प्रशासनाने सुरक्षारक्षक सुद्धा नेमला जात नाही किंवा रात्रपाळीसाठी एखादा वाहतूक नियंत्रकाची सुद्धा नियुक्तीबस स्थानकावर केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा ही रामभरोशीच आहे. राप प्रशासनाने सुरक्षारक्षक हे केवळ आगारासाठीच नेमले आहेत. कळंब बस स्थानक परिसरात राप प्रशासनाने तात्काळ दिवे लावून उजेड करावा. अशी मागणी प्रवाशातून जोर धरत आहे.  

 
Top