धाराशिव  (प्रतिनिधी) - राहत असलेल्या घरावर बुलडोजर फिरवून त्या ठिकाणी अतिक्रमण करीत गुंडांनी जबरदस्तीने समाज मंदिराचे बांधकाम सुरु केले आहे. याबाबत स्थानिक पोलीस ठाणे, तहसिलदार व जिल्हा प्रशासन यांच्याकडे वारंवार न्याय देण्याची मागणी केली. मात्र, कोणीही न्याय दिला नाही किंवा त्यांची साधी दखल देखील घेतली नाही. त्यामुळे त्रासलेल्या पीडित कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच एका कुटुंबाने चक्क अंगावर डिझेल ओतून घेत सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न दि.4 एप्रिल रोजी केला.

कळंब तालुक्यातील सातरा फाटा येथील आदिवासी पारधी समाजाचे किसन भुजंगराव काळे यांनी भारसांगवी शिवारात गट क्रमांक 17 मधील क (3) गुंठे तर गटामधील वीस गुंठे जागा आशाबी मकबुल शेख यांनी जागा दि.20 जून 2002 साली खरेदी केलेली आहे. मात्र लक्ष्मण गणपतराव थोरबोले, भारत गायकवाड, बब्रुवान उबाळे व शरद उबाळे यांनी काळे यांच्या जागेतील पत्र्याचे शेड व संसार उपयोगी साहित्य गायब केले. तसेच वरील थोरबोलेसह इतरांनी शेख यांच्या जागेत 8 जणांकडून 30 ते 40 हजार रुपये घेऊन नोटरी करून देऊन त्यांना अतिक्रमण करायला लावले आहे. त्यामुळे काळे यांच्या जागेचा वाद न्यायालयामध्ये सुरू आहे. तो वाद सुरू असतानाच शासनाच्या माध्यमातून मंजूर असलेले समाज मंदिर लक्ष्मण थोरबोरे यांनी काळे यांच्या जाग्यावरच बांधकाम करण्यास 10-12 दिवसांपासून सुरुवात केली आहे. ते बांधकाम तात्काळ थांबवून गुंडगिरी प्रवृत्तीच्या थोरबोले यांच्यासह वरील सर्व लोकांवर जातीयवादी शिव्या देणे तसेच मालमत्तेचे नुकसान करणे या अंतर्गत ॲट्रॉसिटी (अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी अर्धांग वायू वृद्धग्रस्त किसन उजनराव काळे, कौशल्या उजनराव काळे व पारूबाई किसन काळे या कुटुंबाने चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारातच रखरखत्या उन्हात अंगावर डिझेल ओतून घेत सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.


जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे वारंवार न्याय देण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनावर संबंधित कार्यालयाच्या पोहोच तारखेसह आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी संबंधित पोलीस ठाण्यातील संबंधितास याबाबत काय कार्यवाही केली ? असे विचारले असता आमच्याकडे अर्जच आला नसल्याचे अजब उत्तर दिले गेले. त्यामुळे निवेदनाची दखल घेतली जात नसल्याचे एक प्रकारे याद्वारे अधोरेखित झाल्याचे समोर आले आहे.

 
Top