धाराशिव (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या वतीने “ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन” एल्डर लाईन 14567 ही टोल फ्री सेवा देशभरात सुरू करण्यात आली आहे.
या हेल्पलाईनचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या विविध तक्रारी व अडचणींचे निवारण करणे तसेच त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहाय्य पुरवणे हा आहे.
राज्यामध्ये ही सेवा राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन,आणि जनसेवा फौंडेशन,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जात आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून अत्याचारग्रस्त किंवा उपेक्षित वृद्ध नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा एक विश्वासार्ह,सहजसोप्या स्वरूपातील आधारव्यवस्था निर्माण करते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवता येतो.