धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यातील 50 क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींना रौप्य पदकाने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या “टीबी मुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा“ मध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रॉबर्ट कॉक आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी आरोग्य,वैद्यकीय व प्रशासन विभागातील विविध अधिकारी,मान्यवर सरपंच,डॉक्टर, जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी, व जिल्हा क्षयरोग केंद्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टीबीमुक्त अभियानांतर्गत 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत 6 निकषांवर आधारित मूल्यमापन करून 380 ग्रामपंचायतींना क्षयरोगमुक्त घोषित करण्यात आले.यामध्ये धाराशिव 6, तुळजापूर 4, परंडा 3, वाशी 6, कळंब 9,उमरगा 5, लोहारा 9,भूम 8 अशा 50 ग्रामपंचायतींना रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात शासकीय परिचर्या महाविद्यालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्षयरोगावर आधारित पथनाट्य सादर करून जनजागृती केली. यावेळी एल.टी.,टीबीएचव्ही, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,क्ष- किरण तंत्रज्ञ,पीपीएसए अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.संचालन श्रीमती संध्या दवासे यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ.विनयशील कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.