धाराशिव (प्रतिनिधी)-स्वातंत्र्यसैनिकाच्या बनावट नामनिर्देशन पत्राच्या आधारे तब्बल 31 वर्षे शासकीय सेवेत राहून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप बब्रुवान नामदेव साबळे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तक्रारदार राजाभाऊ राऊत, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांनी दिला आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी धाराशिव यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बब्रुवान साबळे यांनी 22 जून 1993 रोजी स्वातंत्र्यसैनिकाच्या कोट्यातून बनावट नामनिर्देशन पत्राच्या आधारे लेखापाल पदावर शासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीतील चांभार वर्गाचे आरक्षण घेत तीन बेकायदेशीर पदोन्नती मिळवून सेवा पूर्ण केली आणि 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले.

राजाभाऊ राऊत यांच्या म्हणण्यानुसार, या संदर्भातील तक्रार त्यांनी 4 ऑगस्ट 2023 रोजी केली होती. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2024 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी दिलेल्या अंतिम चौकशी अहवालात साबळे यांचे नामनिर्देशन पत्र नियमबाह्य असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

 
Top