मुंबई,(प्रतिनिधी)- " बांधा - वापरा आणि हस्तांतरित करा " या तत्त्वावर खाजगी विकासकांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात धाराशिव येथे भव्य बसपोर्ट उभारण्यात येणार आहे.या बरोबरच येरमाळा व उमरगा येथील बसस्थानक देखील विकसित करण्यात येतील अशी माहिती परिवहन मंत्री तथा पालकमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली.
विधिमंडळात प्रांगणात धाराशिव जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भात बोलावलेल्या बैठकीत श्री.सरनाईक बोलत होते.या बैठकीला तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील, यांच्या सह एसटी महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले,राज्यातील एस.टी. महामंडळाच्या विविध जागा भविष्यात बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर खाजगी विकासाच्या मार्फत विकसित करण्यात येणार आहेत.या जागांचे शहरी,निमशहरी व ग्रामीण असे तीन गट तयार केले असून या तीन गटातील प्रत्येकी एक बसस्थानक याप्रमाणे तीन बसस्थानकाचे एक समुह करून त्यासाठी निविदा मागवली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यभरातील ६० पेक्षा जास्त बस स्थानकांची निविदा मागवली जाणार असून त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, येरमाळा व उमरगा या बसस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे.सुसज्ज बसस्थानक,प्रसाधनगृह, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह याबरोबरच अद्यावत आगार या आगारामध्ये इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग स्टेशन,सोलर प्लांट,वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या सुविधा असणार आहेत.
या संदर्भातील निविदा प्रक्रिया लवकरच राबविली जाणार असून बस स्थानकाच्या कामाला देखील लगेच सुरुवात केली जाईल,अशी ग्वाही मंत्री सरनाईक यांनी दिली.