धाराशिव(प्रतिनिधी)- वित्तीय वर्ष २०२४-२५ समाप्तीच्या पार्श्वभूमीवर शासकीय आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडावेत म्हणून जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांना दिनांक ३० व ३१ मार्च २०२५ रोजी कोषागार कार्यालयाचे व्यवहार पूर्ण होईपर्यंत रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार मार्च महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वित्तीय देवाणघेवाणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.३० मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी (गुढीपाडवा) आणि ३१ मार्च रोजी रमजान ईद असल्याने शासकीय निधीच्या वितरणाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी बँका आणि कोषागारे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात दिनांक ३१ मार्च रोजी सर्व शासकीय प्रदाने केवळ E-Kuber Payment Mode द्वारेच करण्यात येणार असून, धनादेशाद्वारे कोणतेही पेमेंट होणार नाही.त्यामुळे शासकीय रक्कमांचे व्यवहार वेळेत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका व कोषागारे ३० व ३१ मार्च रोजी उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत.