धाराशिव (प्रतिनिधी)- कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र आपल्या  रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणणे.कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कौडगाव एमआयडीसीत देशातील पहिला स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल प्रकल्प, निम्न तेरणा प्रकल्पाच्या दुरुस्ती प्रस्तावास मान्यता असे जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले अनेक महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल जिल्हावासीयांच्या वतीने राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार 29  मार्च रोजी तुळजापूर दौऱ्यावर येत आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांना मोठे पाठबळ दिल्याबद्दल संबंध जिल्हावासीयांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील पाणी आणण्यासाठी 11,700 कोटी रुपयांची सुप्रमा देऊन निधी मिळवून दिला . त्यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला फडणवीस साहेबांच्या सहकार्यानेच गती मिळाली. त्यामुळे तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र आता रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आले आहे: या नवीन रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्यसरकारचा 452 कोटी रुपयांचा हिस्सा मिळाला. लवकरच आता या मार्गावर तुळजाभवानी एक्स्प्रेस धावताना पहायला मिळणार आहे. आपल्या महायुती सरकारच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशास मान्यता मिळवून घेतली.वैद्यकीय शिक्षण संकुलासाठी राष्ट्रीय महामार्गाजवळ 31 एकर जागा व पहील्या टप्प्यात 430 कोटी इतका भरीव निधी मंजूर करवून देण्यातही फडणवीस यांचे योगदान मोठे असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे क्षेत्र वैश्विक दर्जाचे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे, नावारूपाला यावे याकरिता मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकास आराखड्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला. आता हा अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या समोर आहे लवकरच त्यावर सकारात्मक शिक्कामोर्तब होईल असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे. या आराखड्यानुसार आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे 108 फूट उंचीचे शिल्प व भव्य शिवसृष्टीचाही त्यात समावेश आहे. कौडगाव एमआयडीसीत देशातील पहिला स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे. 2019 च्या निवडणुकीपूर्वी स्वतः फडणवीस यांनी धाराशिव येथील महाजनादेश यात्रेदरम्यान त्याची जाहीर घोषणा केली होती. तो शब्द त्यांनी पाळला असून पायाभूत सुविधांसाठी 24 कोटींची निविदा प्रसिद्ध झाली आहे. दहा हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.  संतश्रेष्ठ गोरोबकाकांचे समाधी मंदिर अंतर्बाह्य पुनःनिर्माण करत मंदिर व परिसराचा कायापालट सध्या सुरू आहे. राज्यातील सर्वात पुरातन त्रिविक्रम मंदिर जिर्णोद्धाराचे कामही अंतिम टप्प्यात आहे .प्राचीन “तगर“चा वैभवशाली वारसा जतन व संवर्धन करून जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी 75 कोटींहून अधिक निधी आपल्या सरकारने मंजूर केला आहे.तुळजापूरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तालुक्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसर सुशोभीकरण आणि महामंडळामार्फत होणाऱ्या प्रशिक्षण केंद्रासाठी 50 कोटी, धाराशिव शहरात भव्य स्मारक उद्यानासाठी जागा आणि एक कोटी निधीला मंजूरी, नळदुर्ग येथे राज्यतील पहिली भव्य “बसवसृष्टी, प्रशस्त ध्यानकेंद्रासाठी रु.5 कोटींचा निधी, हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या भव्य स्मारकास अडीच कोटींचा निधी, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तुळजापूर येथील स्मारक उद्यानासाठी 1 कोटी मंजूर, संतश्रेष्ठ गोरोबाकाका,झुंजारसेनानी भाई उद्धवराव पाटील आणि शिक्षणमहर्षी सि. ना. आलूरे गुरुजी यांचे जिल्ह्यातील अनुक्रमे कळंब, धाराशिव आणि तुळजापूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आपल्या मागणीवरून नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे 370 एकरावर नवीन एमआयडीसी मंजुर, निम्न तेरणा उपसा सिंचन योजना दुरुस्तीच्या कामासाठी 113 कोटींच्या प्रस्तावास मान्यता, ऐतिहासिक नळदुर्गची पुढील तीस वर्षाची गरज लक्षात घेऊन 48 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू. शहरातील डीपी रस्ते,नाली व इतर विकासकामांसाठी  150 कोटींहून अधिकचा निधी, नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित. पन्नास वर्षापासूनच्या स्वतंत्र नळदुर्ग तालुका निर्मितीच्या मागणीच्या दिशेने मोठे पाऊल, तुळजापूर शहरात जिजाऊ स्मृती उद्यान, महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा, विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका, नळदुर्ग येथे 2 कोटी निधीतून शादीखाना उभारणीचे काम सुरू, धाराशिव शहरात शादीखाना बांधण्यासाठी 1 कोटी मंजूर अशा अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी खूप मोठे पाठबळ दिले आहे. ज्यामुळे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. त्यासाठी धाराशिव जिल्हावासीयांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा  तुळजापुरात  सत्कार करण्यात येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन यशस्वीपणे पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता, पंढरपूर ला श्री विठ्ठल रुक्मिणी व त्यांचे कुलदैवत श्री नृसिंहाचे दर्शन घेण्यासाठी खाजगी दौऱ्यावर येत आहेत. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. धाराशिव जिल्ह्यासाठी त्यांनी जे भरभरून सहकार्य केले आहे त्यासाठी त्यांचा भव्य सत्कार करण्याची जिल्ह्यातील सामान्य नागरिकांची भावना आहे. मात्र या दौऱ्यात वेळेअभावी हे शक्य नसल्याने जिल्हावासीयांच्या वतीने किमान छोटेखानी ह्रदय सत्कार तरी स्वीकारावा असा आग्रह केल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी मोठ्या आनंदाने सत्कार स्वीकारण्यास अनुमती दिली असल्याचेही आमदार पाटील म्हणाले.


 
Top