धाराशिव (प्रतिनिधी)-कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांसाठी महावितरणने सुरू केलेल्या अभय योजनेचा लाभ घेत धाराशिव मंडळातील २ हजार ३१३ वीजग्राहकांनी १ कोटी ५५ लाख रूपयांची थकबाकी भरत पुनर्जोडणी घेतली आहे. अभय योजनेची मुदत ३१ मार्च २०२५ रोजी संपत आहे. उरलेल्या तीन दिवसात पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
धाराशिव विभागातील १ हजार ४७६ वीजग्राहकांनी ९० लाख रूपयांचा भरणा करत ७६ लाख रूपयांची भरघोस सुट प्राप्त केली आहे. धाराशिव विभागाच्या भूम उपविभागातील ३८ वीजग्राहकांनी २ लाख रूपयांचा भरणा करत २ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. धाराशिव ग्रामीण उपविभागातील १९५ वीजग्राहकांनी १७ लाख रूपयांचा भरणा करत ५ लाख रूपयांची सुट मिळवली आहे, धाराशिव शहर उपविभागातील ८१ वीजग्राहकांनी १२ लाख रूपयांचा भरणा करत ७ लाख रूपयांची सुट मिळवली आहे, कळंब उपविभागातील ५४५ वीजग्राहकांनी १८ लाख रूपयांचा भरणा करत ३८ लाख रूपयांची सुट मिळवली आहे, परंडा उपविभागातील ६७ वीजग्राहकांनी ५ लाख रूपयांचा भरणा करत ३ लाख रूपयांची सुट मिळवली आहे, तेर उपविभागातील ४७० वीजग्राहकांनी २९ लाख रूपयांचा भरणा करत १७ लाख रूपयांची सुट मिळवली आहे, वाशी उपविभागातील ८० वीजग्राहकांनी ७ लाख रूपयांचा भरणा करत ५ लाख रूपयांची सुट मिळवली आहे.
तुळजापूर विभागातील ८३७ वीजग्राहकांनी ६५ लाख रूपयांचा भरणा करत ३८ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. यामध्ये लोहारा उपविभागातील ३०८ वीजग्राहकांनी २१ लाख रूपयांचा भरणा करत १२ लाख रूपयांची सुट मिळवली आहे, उमरगा उपविभागातील १७७ वीजग्राहकांनी १२ लाख रूपयांचा भरणा करत ४ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तर तुळजापूर उपविभागातील ३५२ वीजग्राहकांनी ३१ लाख रूपयांचा भरणा करत २२ लाख रूपयांची सुट मिळवल्याचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला किंवा ताबेदारास थकबाकी भरावीच लागते. त्यामुळे वीजबील थकीत असलेल्या ग्राहकांनी पाच दिवसात अभय योजनेचा लाभ घ्यावा. दोनवेळा मुदतवाढ मिळालेल्या या योजनेस पुन्हा मुदतवाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास १०० टक्के व्याज व विलंब आकार (दंड) माफ होत आहे. मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के अतिरिक्त सवलत मिळत आहे. यासोबतच सुरुवातीस मूळ थकबाकीच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याचीही सोय आहे. तसेच लाभार्थी ग्राहकांना मागणीनुसार त्या जागेवर नव्याने वीजजोडणी दिली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ तीनच दिवस शिल्लक असून, थकबाकीमुक्तीसाठी वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.