मुरुम (प्रतिनिधी)-उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथील मारुती मंदिरात श्री संत तुकाराम बिज व एकनाथषष्ठी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची हभप गुरुवर्य विठ्ठल महाराज दिंडेगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली.सप्ताह काळात वेगवेगळ्या विषयांवर विविध नामवंत किर्तनकारांकडून समाजप्रबोधन करण्यात आले. दिंडेगावकर महाराज यांनी कीर्तनातून भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतल्यापासून बालपणी केलेल्या लीलांचे वर्णन त्याचप्रमाणे अवतार संपेपर्यंत जीवनप्रवासावर प्रबोधन केले.
पश्यात संस्कृतीने आज परिस्थिती बदलत आहे. आपली संस्कृती व संस्कार आपण विसरत चाललो असताना वारकरी संप्रदाय ते जतन करीत असून कीर्तनातून समाज प्रबोधन करीत आहे.देश व धर्म याची महती पटवून देत राष्ट्रभावना जोपासत असल्याचे प्रतिपादन हभप विठ्ठल महाराज यांनी येथील काल्याच्या किर्तनात केले.
यावेळी बोलताना म्हणाले की, देवाला काही नको तो केवळ भक्तीचा भुकेला आहे. तेव्हा भक्तीभावाने लीन व्हा निश्चितच परमेश्वर तुमची मनोकामना पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला. शबरीची उष्टी बोरे, सुदामाचे पोहे, भगवान श्रीकृष्णाचे सर्व वर्णन, असे अनेक दृष्टांत देत आपल्या रसाळ वाणीने उपस्थितांची मने जिंकली.
या किर्तनास मुले, युवक अबाल वृद्धासह महिलांची संख्या मोठी उपस्थिती होती. यावेळी गुंडू करके यांच्या वतीने उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. हा तुकाराम बीज उत्सव अखंड हरिनाम सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी मारुती देवस्थान कमिटी, हनुमान भजनी मंडळ, चंद्रकांत हेंडले, नवनाथ शिंदे, शिवहार मुळे, युवराज पाटील, विलास हेंडले, भीमाशंकर झुरळे, आप्पाराव मुळे, शिवलिंग बिराजदार, गुलाब पांचाळ, मोहन गुरव, परमेश्वर लामाजने,हणमंत लमजणे, राजू करके, महादेव भोईटे यांच्या सह गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.