धाराशिव (ंप्रतिनिधी)- मराठी भाषा समृद्ध असून या भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे या भाषेच्या प्रसार व प्रचारासाठी दरवर्षी केंद्राकडून पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे.मात्र,मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी ती टिकून ठेवणे व समृद्ध करणे हे सर्व पुढील मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे यांनी दि. 25 मार्च रोजी केले.
धाराशिव येथील जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने ग्रंथोत्सव 2024 चे आयोजन 24 व 25 मार्च रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे.दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आव्हान आणि संधी या सत्रात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी जिल्हा ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष व.ग.सुर्यवंशी, प्राचार्य प्रशांत चौधरी, प्रा संजय गुरव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना अत्रे म्हणाले की, जागतिकीकरणाचा व मराठी भाषेचा काहीही संबंध नाही. मराठी भाषेच्या वृद्धीसाठी नवीन साहित्यिक निर्माण झाले पाहिजेत. तसेच त्यांनी नवीन साहित्य निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे.मात्र ते साहित्य दर्जेदार असणे आवश्यक आहे.जर एखाद्या साहित्यिकांनी आपले साहित्य लिहिले मात्र ते दर्जेदार कसे करायचे यासाठी स्वतंत्र समिती गठीत केल्यास त्या साहित्याला चांगल्या पद्धतीने वाचकांसमोर नेता येऊ शकते असा सल्लाही त्यांनी दिला.संतश्रेष्ठ गोरोबा काकांनी ज्याप्रमाणे पक्की गाडगी बनवली,त्याप्रमाणेच साहित्यिक देखील पक्के बनविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.विशेष म्हणजे आपली संस्कृती दिवा विजविणारी नाही तर ती दिवा लावणारी आहे असे सांगत पाश्चात्य पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीवर ही त्यांनी नाराजी व्यक्त केली.आपली संस्कृती ही अत्यंत महत्त्वाची असून ती नैसर्गिकता भौगोलिकता सामाजिकता होऊन वारा पाऊस यापासून निर्माण झालेली असल्यामुळे तिला विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. तर मराठी साहित्य दर्जेदार निर्मिती व्हावे यासाठी प्रत्येकाकडे मराठी शब्दकोश असणे आवश्यक असल्याचे सांगत ते म्हणाले की, आपली भाषा टिकून ठेवणे व समृद्ध करणे हे आव्हान आहे तर अभिजात दर्जा मिळाला ही मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रा.चौधरी म्हणाले की,साहित्य संमेलने होणे आवश्यक असून त्या माध्यमातून वैचारिक कलह दूर होण्यास मदत होते. तसेच भाषा ही समाज मन जाणणारी असून ती जिवनात अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. बऱ्याच अवधीनंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असून राजाश्रय मिळालेला आहे.त्यामुळे आयआयटीत मराठी भाषेतून शिक्षण देऊन इंजिनिअर व डॉक्टर तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. विशेष म्हणजे ज्या विविध आयआयटी क्षेत्रातील कंपन्या आहेत त्या कंपनीमध्ये जे विद्यार्थी काम करतात त्यांना त्या त्या देशाची भाषा अवगत करावी लागते.त्याचप्रमाणे मराठी भाषा देखील प्रत्येकाला अवगत असणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्यिकांनी देखील मराठीमध्ये साहित्य निर्मिती करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.तसेच गुरव म्हणाले की, मराठी भाषेला राजश्री मिळाला आता लोकाश्रय मिळायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठीत शिक्षण घेणे आवश्यक आहे.मात्र जगायचे असेल तर हिंदी व इतर भाषेतून शिक्षण घेणे क्रमप्राप्त असल्याचेही त्यांनी नमूद केले.विशेष म्हणजे इतर भाषेतील साहित्य ज्याप्रमाणे भाषांतरित केले जाते त्याचप्रमाणे मराठीतील साहित्य देखील इतर भाषांमध्ये भाषांतरित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक हनुमान ढाकणे यांनी तर सूत्रसंचालन डॉ रुपेशकुमार जावळे यांनी मानले.
तर दुसऱ्या कथाकथन सत्राच्या अध्यक्षा प्रा.सुनिता गुंजाळ यांनी बसची वारी...लय भारी कथा सादर करून बसचा प्रवास हा विमान किंवा इतर वाहनापेक्षा किती कैक पटीने चांगला असल्याचे उदाहरणासह सांगत उपस्थितांची मने बांधून ठेवण्यासह त्यांना अक्षरशः बसमध्ये जणू ते स्वतः प्रवास करीत असल्याचे भासविले. तर वसुंधरा गुरव या विद्यार्थिनीने चिमणा कावळीची आर्त साद कथन करून कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता स्वतःच कसे ताठ मानेने जगावे याचा सुरेख संदेश दिला.तसेच तनुजा मंजुळे या विद्यार्थिनीने सुधा कृष्णमूर्ती यांची सलाम-नमस्ते या कथेच्या माध्यमातून मुस्लिम व हिंदू यांच्यामध्ये विनाकारण करण्यात येत असलेल्या जातीय तेढावर कशी मात करावी याचे मूर्तिमंत उदाहरण देऊन उपस्थितांना विचार मग्न होण्यास भाग पाडले.
सुषमा मोरे या विद्यार्थिनीने लबाड माणसे आपल्या स्वार्थासाठी इतरांची कशी फसवणूक करतात मात्र,त्या लबाडाला देखील महागुरु कसा भेटतो व त्यामुळे त्याचे सर्व कारणामे कसे त्याच्या तोंडून बाहेर पडतात हे दाखवून उपस्थितांची मने जिंकली.तसेच अनुज कोळी दमा बिराजदार यांची तर जान्हवी कुलकर्णी या विद्यार्थिनींनी खुशाल चेंडू कथा सादर केली.तसेच अनुज कोळी या विद्यार्थ्याने शंकर पाटलांची दारुड्याची दिंड ग्रामीण भाषेत कशी काढले जाते व ती काढताना गावकऱ्यांची काय फजिती होते हे त्याने अगदी शैलीदार पद्धतीने मांडून उपस्थितांना खिळवून ठेवले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम नवले यांनी व उपस्थितांचे आभार व.ग. सुर्यवंशी यांनी मानले.
तर तिसऱ्या सत्रात...धाराशिव जिल्ह्याची प्राचीन ओळख...या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक युवराज नळे होते.तर या सत्रामध्ये संशोधक रवींद्र शिंदे व जयराज खोचरे यांनी सहभाग नोंदविला.खोचरे यांनी यादवकालीन इतिहास,जैनांचे पवित्र स्थान असलेले कुंथलगिरी ते आजच्या उस्मानाबादचे धाराशिव नामांतर व जिल्ह्यात असलेल्या लेण्या व शिलालेख यावर सविस्तर भाष्य केले.
तर शिंदे यांनी सम्राट अशोक यांच्यापासून तेर,धाराशिव लेणी,हिंगळज देवीचे मंदिर, उपळा येथील मंदिर,सोनारी, माणकेश्वर तीर्थ (बु) व जागजी आदी बौद्ध स्थळासह सर्व धर्मीय स्थळांचा इतिहास मांडला. तसेच नळे यांनी नागेशनगरी ते येथील जैन,बौद्ध व हिंदू यासह येरमाळा, तुळजापूर,कुंतलगिरी धाराशिव लेणी,चमार लेणी आदीसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या सांस्कृतिक व पौराणिक स्थळावर विषयांवर सविस्तर मांडणी केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी तर उपस्थितांचे आभार नळे यांनी मानले.दिवसभर चाललेल्या तिन्ही सत्रास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.