धाराशिव (प्रतिनिधी)- वारंवार सुचना देऊनही सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 च्या कामाला विलंब होत असल्याने गतवर्षी टोल बंद आंदोलन करून काम सुरू करण्यास भाग पाडण्यात आले होते. त्यानंतरही काही भागांतील काम अपूर्ण राहिल्याने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार प्रविण स्वामी, प्रकल्प संचालक, उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत या महामार्गाची पाहणी करण्यात आली.

यावेळी अणदूर ते उमरगा दरम्यानच्या रस्त्याच्या अपूर्ण कामांची तपासणी करण्यात आली. अणदूर येथे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने काही घरांमध्ये पाणी शिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, महामार्गावरील उड्डाणपूल आणि बायपास मार्गांच्या कामांच्या मुदती निश्चित करण्यात आल्या. अणदूर उड्डाणपूल व नळदुर्ग बायपास 5 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन, येणेगूर व मुरूम मोड उड्डाणपूल 31 मार्चपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश, आष्टा मोड उड्डाणपूल 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना, भोसगा व जकेकुर येथे पादचारी पुलांची गरज असल्याने सदर ठिकाणी पुल उभारणेबाबत सुचना करण्यात आले आहे.

सततच्या पाठपुराव्यांमुळे डाळिंब, उमरगा चौरस्ता व तुरोरी येथील उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले असून, त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. यावेळी आलियाबाद शिवारातील शेतकऱ्यांचा शेतरस्ता पूर्णतः बंद झाल्याने त्यासाठी पर्यायी मार्ग देण्याची मागणी झाली. तसेच, भू-संपादन व मावेजा संदर्भातील प्रलंबित प्रकरणे सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश देण्यात आले. या दौऱ्यात आमदार प्रवीण स्वामी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, तसेच संबंधित प्रशासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.


 
Top