धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता उद्योग समूहाचे कुटुंबप्रमुख ॲड व्यंकटराव गुंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि सहकार क्षेत्रातील इतर उद्योगाच्या माध्यमातून अल्पावधीमध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे असे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले. औसा येथील रूपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या स्थलांतरित शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी रूपामाता जोगसमूहाचे संस्थापक ॲड व्यंकटराव गुंड यांनी प्रास्ताविकातून रूपामाता उद्योग समूहाच्या प्रगतीची आणि वाटचालीची सविस्तर माहिती दिली. आईच्या निधनानंतर आपण चांगल्या कार्याच्या रुपाने आईची सतत आठवण राहावी म्हणून स्थापन केलेल्या सर्वच उपक्रमाला ठेवीदार सभासद व अधिकारी कर्मचारी वर्गाचे सहकार्य मिळत असल्यामुळे आपण हे करू शकलो असे ऍड व्यंकटराव गुंड यांनी यावेळी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रुपामाता मल्टी स्टेटच्या स्थलांतरित शाखेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, हभप बाबुराव पुजारी, संतोष मुक्ता, सुभाष जाधव, अविनाश पवार, बाजार समितीचे उपसभापती भीमाशंकर राचट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी औसा, धाराशिव, तुळजापूर आणि लातूर तालुक्यातील अनेक गावचे सरपंच यांच्यासह ठेवीदार व्यापारी व औसा शहरातील विविध नागरी व मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण जंगाले यांनी केले. तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय व्यवस्थापक गोपाळ जंगाले, शाखा व्यवस्थापक किशोर जंगाले, दीपक ढोक यांनी विशेष परिश्रम घेतले.