धाराशिव (प्रतिनिधी)-  अक्षरवेल महिला साहित्य मंडळ धाराशिव, आम्ही सिद्ध लेखिका धाराशिव आणि सुशिलादेवी साळुंखे शिक्षणशास्त्र महाविद्यालय धाराशिव  यांच्या संयुक्त विद्यमाने  मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून बहारदार असे विशाखा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले .टाळ मृदंगाची साथ,ज्ञानबा तुकारामाचा जयघोष,मराठी भाषेचा जागर करणारी चिमुकल्यांच्या हातातील पत्रके,मराठमोळं रूप लेऊन आलेल्या सर्व साहित्यिका .,माऊलीच्या ग्रंथाची फुलांनी सुशोभित केलेली दिंडी ,दारातील मोहक रांगोळी ,आकर्षक बॅनर आणि फुलांनी सजवलेली देखणी  समई ..याहून अप्रतिम नियोजन काय असू शकते याचा प्रत्यय आला. 

संमेलनाध्यक्षा म्हणून उदगीरच्या प्रसिद्ध साहित्यिक सौ. अश्विनी  निवर्गी,प्रसिद्ध साहित्यिक सौं.अर्चना नळगीरकर , प्राचार्य डॉ. प्रकाश कांबळे ,

अक्षरवेलच्या विद्यमान अध्यक्ष डॉ. सुलभा देशमुख , संस्थापक अध्यक्ष डॉ. रेखा ढगे, कमलताई नलावडे , आम्ही सिद्ध लेखिकाच्या धाराशिव जिल्हा अध्यक्ष स्नेहलता झरकर -अंदुरे यांची संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती होती.दिपप्रज्वलनआणि प्रतिमापूजनानंतर हेमा अंदुरे  यांनी सरस्वती स्तवन सादर केले.अक्षरवेल च्या अध्यक्षा माजी  प्राचार्या डॉ. सौ सुलभा देशमुख  यांनी प्रास्ताविकात अक्षरवेलमधील सर्व महिला साहित्यिकांच्या लेखनाबद्दल गौरवोद्गार  काढले आणि अशीच अक्षरवेल बहरत राहील अशी आशा व्यक्त केली .आम्ही सिद्ध लेखिकाच्या अध्यक्षा स्नेहलता झरकर- अंदुरे यांनी आम्ही सिद्ध लेखिका या समूहाची एकंदरीत ध्येय धोरणे स्पष्ट  केली .पाहुण्यांचा परिचय अत्यंत नेटक्या शब्दांमध्ये उपाध्यक्षा प्रा.विद्या देशमुख यांनी करून दिला ,आपल्याला घराचा संसार भक्कम करून पुन्हा साहित्याचाही संसार भक्कम करायचा आहे असे संमेलनाध्यक्षा अश्विनी निवर्गौ म्हणाल्या....तर शुद्ध आणि अस्खलित मराठी भाषा वापरणे हाच मराठीचा गौरव आहे असे उद्गार .प्रमुख अतिथी सौ अर्चना नळगीरकर  यांनी काढले . साहित्य माणसाच्या हृदयाचा ठाव घेते,अंतरंगात प्रवेश करते असे  उदघाटक प्राचार्य डॉ.कांबळे  म्हणाले. अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या प्रमुख मार्गदर्शिका आणि कार्याध्यक्षा आ. कमलताई नलावडे  म्हणाल्या की अक्षरवेल मधल्या सर्व साहित्यिकांचे आपापल्या परीने या कार्यक्रमासाठी सहकार्य असते म्हणूनच आम्ही अत्यंत यशस्वीपणे कोणताही  कार्यक्रम पार पाडू शकतो ..या कार्यक्रमात कवयित्री जयश्री फुटाणे यांच्या आत्मजा या काव्यसंग्रहाचे आणि  योगिता  सुरवसे यांच्या चंद्रयोग या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले आणि शेवटी कार्यक्रमाचे आभार अक्षरवेल साहित्य मंडळाच्या  संस्थापक अध्यक्षा डॉ.सौ रेखा ढगे यांनी आपल्या मधुर शैलीत मानले तर बहारदार असं  सूत्रसंचालन करून कार्यक्रम हसताखेळता ठेवण्याचे काम प्रा.सुनिता गुंजाळ यांनी केले.

उद्घाटनाच्या  पहिल्या सत्रानंतर दुस-या सत्रामध्ये  कथा लेखन कार्यशाळा संपन्न झाली  सौ. अश्विनीताई निवर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यशाळेत  प्रोजेक्टर च्या साहयाने कथा कशी लिहावी, कथाबीज कसे शोधावे, कथेचा सुरूवात मध्य आणि शेवट कसा करावा, कथेला नावे कशी  द्यावीत ,कथेचे स्वरूप, आवाका, कथेची लांबी ,प्रकार इत्यादी बाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले .आभार ज्योती कावरे यांनी मानले .संमेलनाचे प्रमुख आकर्षण कथालेखन कार्यशाळा ठरली.

अत्यंत रूचकर अशा भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर तिसऱ्या सत्राला सुरुवात झाली. यात कथाकथन घेण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवनंदा माळी  यांनी केले तर अध्यक्षस्थानी डॉ.सोनाली दिक्षित  या होत्या विविध कथांचे अत्यंत खूमासदार,मनोरंजक आणि उत्कृष्ट  सादरीकरण झाले त्यामध्ये प्रा.अश्विनी निवर्गी  ,प्रा. सुनिता गुंजाळ ,अर्चना नळगिरकर,डॉ. सोनाली दीक्षित  रोहिणी नायगावकर, शिवनंदा माळी, उज्वला मसलेकर ,इत्यादींनी अतिशय दर्जेदार कथा सादर केल्या .आभार जयश्री फुटाणे यांनी मानले.


 त्यानंतर चौथे सत्र गझल मुशाय-याचे होते.मुशाय-याच्या अध्यक्षस्थानी प्रा.विद्या देशमुख होत्या. एक से बढकर एक शेरांच्या उधळणीमध्ये,अत्यंत रंगतदार असा  गझल मुशायरा संपन्न झाला. यामध्ये गझलकारा स्नेहलता झरकर -अंदुरे , डॉ. रेखा ढगे,किरण देशमाने  ,बी सुरभी, कांचनगंगा मोरे ,प्रा.विद्या देशमुख यांनी गझला सादर केल्या ,सुत्रसंचालन बी.सुरभी यांनी केले

आणि कार्यक्रमाच्या पाचव्या सत्रामध्ये विविध कवयित्रींनी विविध विषयावर अत्यंत सुंदर रीतीने चिंतनशील तसेच विनोदीही कविता सादर केल्या ,यामध्ये उषा देशमुख ,सविता जाधव, जयश्री फुटाणे ,अर्चना गोरे, योगिता सुरवसे ,स्वप्नाली झाडे ,ज्योती कावरे, सारिका देशमुख ,सारिका उमरकर, अश्विनी धाट ,जयश्री जगदाळे ,वर्षा मुस्कावाड, संजीवनी कुलकर्णी ,अनिता संकाये ,माधुरी स्वर्गे , उषा तोंडचिरकर ,साधना तावडे, अस्मिता बुरगुटे, अपर्णा चौधरी , स्मिता पेशवे, प्राची नायकवाडी ,ज्योती मगर ,इत्यादी कवयित्रीनी सहभाग घेतला .कविता  सूत्रसंचालन अपर्णा चौधरी  यांनी केले , या सत्रात छोट्या तेजस्विनी अत्रे हिने हे आदिमा हे अंतिमा हे गीत गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या समारोपामध्ये म्हणजेच सहाव्या सत्रात नवोदितांना प्रोत्साहनपर अशी कविता गझल कथा यामध्ये  सादरीकरणासाठी बक्षीसे ठेवण्यात आलेली होती तसेच श्रोत्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला ,त्यामुळे श्रोत्यांचा तसेच साहित्यिकांचाही उत्साह खूपच दुणावला एकंदरीत संमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अक्षरवेल अध्यक्ष डॉ  सुलभा देशमुख मॅडम ,मार्गदर्शिका कमलताई नलावडे मॅडम ,डॉ. रेखा ढगे मॅडम ,स्नेहलता झरकर मॅडम तसेच सर्व सदस्यांनी खूप परिश्रम घेतले.

 
Top