धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा महामार्ग टेंभुर्णी-लातूर हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी- कुर्डूवाडी-बार्शी-पांगरी, धाराशिव जिल्ह्यातील येडशी, तडवळा, ढोकी व लातूर जिल्ह्यातील मुरुड या मोठ्या बाजारपेठांना जोडणारा आहे. मराठवाडयाचे प्रवेशद्वार असलेले बार्शी शहरातून थेट पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क निर्माण करणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता. या राष्ट्रीय मार्गाच्या चौपदरीकरणाच्या अनुषंगाने लोकसभेत दि. 21/11/2019 रोजी तारांकीत प्रश्न खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मांडून सभागृहाचे लक्ष वेधले होते. तसेच सदर महामार्गाच्या चौपदरीकरणाकरिता अनेक वर्षापासून प्रयत्न चालू होते. तसेच अर्थसंकल्प अधिवेशनात दि. 09/03/2021 रोजी नियम 377 च्या माध्यमातून हा विषय मांडला. राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता, लातूर यांच्या सोबत दि. 05/10/2021 रोजी धाराशिव येथे आढावा बैठक घेतली दि. 04/08/2022 रोजी मा. नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. दि. 21/12/2023 रोजी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नितीन गडकरी यांची याबाबत दि. 18/12/2024 रोजी दिल्ली येथे निवासस्थानी भेट घेवून सदर मार्गाच्या चौपदरीकरणाबाबत पाठपुरावा केला होता. लोकसभेचा सदस्य या नात्याने विविध आयुधाचा वापर करत संबंधित प्रश्नाकडे सभागृहाचे वारंवार लक्ष वेधले होते.
लोकसभेच्या अधिवेशन काळात नितीन गडकरी यांनी खासदार महोदय यांना प्रत्यक्ष भेटण्यासंदर्भात सांगितले होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन या महामार्गाच्या अनुषंगाने दि. 19/12/2024 गडकरी साहेब यांच्या निवासस्थानी भेटीदरम्यान समक्ष चर्चा केली. यावेळी मंत्री यांनी सदर महामार्गास 574.18 कोटी रुपये मंजूर केले असल्याचे कळविले आहे.
जवळा (दु) ता. जि. धाराशिव ते बोरगाव (काळे) ता. जि. लातूर अंतर 37.525 किमी मार्गाच्या चौपदरीकरणासाठी 574.18 कोटी रुपये मंजुर झाले आहे. सदरील काम निविदा स्तरावर आहे. बैठकीदरम्यान सदर महामार्गाच्या चौपदरीकरण करण्याकरिता आढावा घेण्यात आला होता. टेंभुर्णी-लातूर चौपदरीकरण संघर्ष समितीच्या वतीने अनेक वेळा आंदोलन देखील करण्यात आले होते. तसेच या समितीच्या वतीने नागपुर येथे आमरण उपोषण करण्यात आले होते. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून सदर महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
यामुळे शिक्षणासाठी व मोठी बाजारपेठ असलेल्या लातूर शहराशी व पश्चिम महाराष्ट्रातील अन्य महत्त्वाच्या शहराशी थेट संपर्क होण्यास व दळणवळण दरम्यान होणारा विलंब या सर्व समस्यांचा निपटारा होणार असून या महामार्गाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यांचा कमी वेळेत व जलद गतीने संपर्क स्थापित होणार आहे.
याबाबत दि. 15/02/2025 रोजी दु. 12.00 वा. राजलक्ष्मी मंगल कार्यालय, ढोकी येथे बैठक लावण्यात आली आहे. या बैठकीस खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमार कैलास पाटील, कार्यकारी अभियंता, लातूर, राष्ट्रीय महामार्ग सल्लामसलत उपस्थीत राहणार असून त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या बैठकीस मौजे जवळा (धु), दुधगाव, कसबे तडवळा, ढोकी, कोल्हेगाव, ढोराळा, मुरुड या भागातील नागरीकांनी उपस्थीत रहावे व या महामार्गाच्या बाबतीत काही शंका, प्रश्न असतील त्यांनी उपस्थीत राहण्याचे अवाहन खासदार संपर्क कार्यालय धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.