परंडा (प्रतिनिधी)- लोकशाही बळकट करण्यासाठी चांगल्या मतदारांची गरज आहे असे प्रतिपादन परंडा येथील नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय व तहसील कार्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून परंडा येथील नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर नोडल अधिकारी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे प्रा विजय जाधव ,प्रा रणजीत वरपे तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी प्रा विजय जाधव , प्रा रणजीत वरपे यांनीही आपली मनोगत व्यक्त केली.पुढे बोलताना नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर म्हणाले की देशातील लोकशाही टिकविण्यासाठी 21 व 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुण-तरुणींनी आपल्या मताची नोंदणी करून मतदान केले पाहिजे. समाजात मतदान जागृती केली पाहिजे. तरुण युवकांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय कार्य केले पाहिजे.तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने प्रत्येक वर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त 25 जानेवारी 2011 पासून याची सुरुवात करण्यात आली आहे.राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कनिष्ठ वरिष्ठ भागातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमासाठी अमोल हंकारे ,ज्ञानेश्वर गुळमिरे, यशपाल बनसोडे, जीवन बनसोडे, हनुमंत करळे इत्यादी तहसीलचे कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी भागवत दडमल , उत्तम माने, सुजित पवार यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार प्राध्यापक रणजीत वरपे यांनी मानले.